सततच्या पावसाने शेतीपिकांचे नुकसान : मुक्काम वाढल्याने बळीराजा पुरता हतबल
पूर्व हवेलीत पिकांचे पंचनामे करण्याची मागणी
उरुळी कांचन – पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यामुळे पीके सडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. परिणामी सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
फ्लॉवर, कोबी, भेंडी, काकडी, मिरची, वांगी, टोमॅटो या भाजीपाला पिकांबरोबरच झेंडू, चारा पिके आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकांचे संगोपन केले आहे. परंतु सततच्या संततधार पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही वसूल होणार नाही. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी नायगावचे शेतकरी विशाल शेलार, उरुळी कांचनचे शेतकरी संभाजी कांचन, अमोल भोसले व भाऊ ढवळे यांनी केली आहे.
पूर्व हवेलीत मागील आठ दिवसापासून पडत असलेला पाऊस बाजरी, पालक, कोथिंबीर, शेपू आदी पिकांसाठी अडथळा ठरत आहे. शेतातील ओल हटत नसल्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायती पट्ट्यातील परिसरातील जमिनीत ओलावा कमी होत नाही. त्यातच पाऊसही उघडीप देत नाही. परिणामी, काढणीस आलेल्या पिकास पाऊस अडथळा ठरत असून उभी पिके आडवी झाली आहेत.
दरम्यान, पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका सुरूच आहे. हातातोंडाशी आलेल्या खरिपातील सर्वच पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सततच्या पावसामुळे पिके रोगाला बळी पडली आहेत. पिकांवर औषध फवारणी करूनही उपयोग होत नाही. औषधे फवारली तरी पावसामुळे ते वाया जात आहे. रोग आटोक्यात येत नसल्याने शेतातील पिके करप्याने जागच्या जागेवर बसली आहेत. पिके सोडून देण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पुणे – पहिले मान्सून पावसाने तर आता परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. भाजीपाला, फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे दोन पैसे हाती येण्याऐवजी खर्च केलेला खर्चही निघणार नसल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.
इंदापूर तालुक्यात शेतीकामे खोळंबली
इंदापूर –इंदापूर तालुक्यात नवरात्र महोत्सवामध्ये व सद्यस्थितीत सातत्याने पावसाची रिपरीप, तर बावडा काटी परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी लावली. काही भागात थोडे ऊन पडू लागले तर, काही ठिकाणी पावसाचा शिडकावा सुरू असल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. मुक्काम वाढवलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
यासंदर्भात शेतीनिष्ठ शेतकरी साहेबराव मोहिते यांच्याशी संवाद साधला असता म्हणाले, काटी, वरकुटे, निमगाव केतकी परिसरामध्ये शेतकरी जनावरांच्या चारासाठी मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतो. यंदाही मक्याची पीक जोमात आले होते; मात्र सातत्याने पडणारा पाऊस यामुळे मका उत्पन्नावर गंभीर परिणाम झालेला आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतातील कोणतेही पीक शेतातून बाहेर काढता येत नाही. तसेच शेतीची मशागत करता येत नाही. शासनाच्या माध्यमातून ज्या मका उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. त्यांचे सर्वच पंचनामे करून, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची भूमिका शासनाने करावी.
बहुतेक साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र या पावसाने ऊस तोडणीसाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. बाहेरच्या तालुक्यातील ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंद केला आहे. त्यांच्या उसाचे पुढील काही दिवसात, असाच
पाऊस राहिला तर काय होणार? अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आठवडे बाजारांवर संकट
इंदापूर तालुक्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असताना कुठेतरी प्रपंच रोजची रोज चालावी, यासाठी दुग्ध व्यवसायाच्या जोडीला तरकारी करण्याचा व्यवसाय अनेक शेतकरी करतात. त्यामुळेच गावात भरणारा व इतर ठिकाणी आठवडे बाजार यामध्ये, आपल्या शेतात पिकलेला भाजीपाला विक्रीसाठी आणतात; मात्र दिवसभर पावसाची रिपरीप राहिल्यामुळे, भाजीपाला कोणाला विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
बारामतीच्या पश्चिम भागात ढगफुटीसदृश पाऊस
मुर्टीच्या बाजारात विक्रेते, शेतकऱ्यांची तारांबळ
मोरगाव –बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुर्टी येथील आठवडे बाजारात विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, मुर्टी, मोरगाव, लोणी भापकर, आंबी, जोगवडी परिसरात मुसळधार पाऊस पडला. मोरगाव – बारामती या जिल्हा मार्गावरील वाहतूक पावसामुळे काही वेळ बंद होती. मुर्टी, सोमेश्वरनगर येथील आठवडे बाजारातील अनेक शेतकऱ्यांच्या राहुट्या पावसाने उडाल्या. येथील आठवडे बाजारासाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले कट्टे गेल्या अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहेत. बाजार सखल भागामध्ये बाजार भरत आहे. त्यामुळे रुरल हट कट्टे ठिकाणी बाजार भरविण्याची मागणी भाजपचे बाळासाहेब बालगुडे यांनी केली आहे.
लोणी देवकर परिसरात दमदार पाऊस
लोणी देवकर – मागील काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने दडी मारली होती. मागील काही आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने लोणी देवकरसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने अनेकांची धांदल उडवली. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गणेशोत्सवात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान झाला आहे. या दमदार पावसामुळे शेतामध्ये आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठले होते. त्यामुळे पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्याची क्षमता तूर्तास तरी मिटली असल्याचे येथील शेतकरी दिनकरराव देवकर यांनी सांगितले.