मुंबई : मागील काही वर्षात आपला देश विकासविषयक विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे. देशामध्ये युवकांमधील नवनवीन संकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स यांना चालना देण्यात येत आहे. या क्षेत्रात योगदान देत असलेल्या युवक-युवतींनी आपल्या कल्पना, आपले कार्य भारत देशासाठी समर्पित करावे, यामुळे देशातील इतरही युवक-युवतींना पुढे येण्यास मदत होईल. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यामधून नाविन्यता आणि उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्टार्टअप सप्ताह आणि स्टार्टअप यात्रेतील विजेत्यांना आज राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी़ डॉ. रामास्वामी एन. आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र.शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ २०२२ तसेच ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ विजेता सन्मान सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला. pic.twitter.com/oBiz1mQ7Id
— Governor of Maharashtra (@maha_governor) October 16, 2022
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विविध क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे. मागील आठ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात मोठी आघाडी मिळवली आहे. यापुढील काळातही देशाला अधिक प्रगत बनविण्यासाठी सर्वांनी परिश्रम, दृढसंकल्प आणि आत्मविश्वासाने साथ द्यावी. देशातील युवक नवनवीन संकल्पना आणून यात योगदान देत आहेत, स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सची निर्मिती करीत आहेत. या क्षेत्रामध्येही आता युवकांनी ‘युनिक’ काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. देशात मागील वर्षभरात नव्याने सुरू झालेल्या ४२ युनिकॉर्नपैकी ११ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. रजिस्टर्ड स्टार्टअप्समधील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २०१८ मध्ये राज्याचे स्वतंत्र स्टार्टअप धोरण आखले होते. यामुळे राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टीम तयार झाली. आपण देशाला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये इनोवेशन्सचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आयटीआयचे आधुनिकीकरण करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप्स विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.