माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
पिंपरी (प्रतिनिधी) – जगामध्ये ज्या देशांनी मुलभूत पायाभूत सुविधा निर्माण केल्या ते देश विकासात अग्रेसर राहिले. पुढील 15 वर्षांमध्ये भारताला जगात सर्वोत्तम बनवायचे असेल तर पायाभूत सुविधांचा विकास खुप गरजेचा आहे. शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादन खर्चात कपात करायला हवी. तंत्रज्ञानाची कास धरूनच आपण विकासाची गती वाढवू शकतो. जागतिक मंदीतही आपली अर्थव्यवस्था 5 टक्के विकसित झाली आहे. मोठ्या प्रमाणात “स्टार्ट अप’ तयार होत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 11) केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित मोरया युथ फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस यांची सिने अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी फडणवीस यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. बालपणात झालेले संस्कार, राजकीय कारकीर्द, विद्यार्थी परिषदेतील अनुभव, वयाच्या 21 व्या वर्षी मिळालेले नगरसेवकपद अशा विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
फडणवीस म्हणाले, देशातील शेती क्षेत्र हे वातावरणातील बदलांवर अवलंबून आहे. अतिवृष्टी, अवर्षण अशा परिस्थितीत शेती कशा पद्धतीने करायची हा मुद्दा नेहमीच चर्चेचा राहिला आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम न होणारी शेती करणे आवश्यक आहे. सध्या 5 हजार गावांमध्ये अशा शेतीचा प्रयोग सुरू आहेत. शेतीच्या शाश्वत विकासासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणणे गरजेचे आहे. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आल्यास रोजगाराच्या संधी वाढतील.
माझे वकील होण्याचे स्वप्न होते. त्यानुसार मी वकिलीचे शिक्षण घेत होतो. राजकारणात जाण्याचे ठरविले नव्हते. विद्यार्थी परिषदेचे काम करीत असताना भाजपसाठी काम करण्याबाबत सुनील आंबेकर यांनी सांगितले. तेथुनच सुरवातीला वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम सुरू केले. वयाच्या 21 व्या वर्षी मी नगरसेवक झालो. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर राहिला. राजकीय जीवनात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समर्पित जीवनाचा आदर्श माझ्यासमोर राहिला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयीन जीवनात वादविवाद स्पर्धांमध्ये पहिल्यांदा मला अपयश आले. त्यामुळे स्पर्धेत मत मांडताना आपण सर्वात हुशार आहोत. जगात आपल्यापेक्षा हुशार कोणीही नाही. समोर बसलेले सर्व मुर्ख आहेत, असे समजून आपण बोलायचे, असा सल्ला मला मित्राने दिला होता. त्यानुसार मत मांडल्यानंतर स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला. मात्र, नंतर जाणवले की हे खोटे आहे. आता वाटते की आपणच मूर्ख होतो, अशी एक आठवण फडणवीस यांनी सांगितली. प्रत्येक काम करताना मी सकारात्मक विचारानेच केले. त्यामुळेच मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी “पुन्हा येईन’ अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली.