सातारा – जकातवाडी (ता. सातारा) येथे घरांच्या भिंतींवर प्रसिद्ध कवींच्या कविता लावून “कवितांचे गाव’ म्हणून गावाची ओळख निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते “कवितांचे गाव’ नामफलकाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले.
जकातवाडी येथे विद्यावर्धिनी ग्राम वाचनालयाच्या संकल्पनेतून “कवितांचे गाव’ तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमास साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, शिल्पा चिटणीस, सरपंच चंद्रकांत सणस, उपसरपंच हनुमंत भोसले, वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे, मुख्याध्यापक मंगेश नलवडे, ग्रामसेवक धुमाळ, योगेश शिंदे, धनंजय दौंडे, अमोल कांबळे, सुनंदा पारटे, दीपक देवकर, अनिल ठोंबरे, निर्मला लोंढे, आदित्य पारटे, जिजाबाई पारटे, ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी उपस्थित
होते.
यावेळी अरुणा ढेरे म्हणाल्या, “जकातवाडीसारख्या गावामधून ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि वाचनालयाच्या माध्यमातून राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.’ वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे यांनी कवितांचे गाव कशा प्रकारे साकारत आहे, याची माहिती दिली.
“गावातील प्रत्येक भिंतीवर कविता लावण्यात येणार आहे. सध्या काही कवितांचे काम झालेले आहे. अजून कविता लावण्याचे काम सुरू आहे. कविता सर्वांना येता- जाता वाचता येतील आणि त्याचा आनंद घेता येईल.’ सरपंच चंद्रकांत सणस यांनी आभार मानले.