पुणे – राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील परीक्षेच्या मूल्यमापनाचा निकाल तात्काळ कळवावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी जारी केले आहेत.
राज्यात गेल्या महिन्यापासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने १४ एप्रिल, ३ मे व आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन मध्ये टप्प्या टप्य्याने वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. शाळा व महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आलेली आहेत. इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत असा प्रश्न शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांपुढे निर्माण झाला होता. शासनाने या सर्व वर्गांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही घेतला. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचीही घोषणा करण्यात आली.
शैक्षणिक नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन निकाल तयार करण्याच्या सूचनाही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. दरवर्षी एप्रिल अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना निकाल तयार करुन वाटपही करण्यात येतात. यंदा मात्र करोनामुळे त्यात अडथळा निर्माण झालेला आहे. बहुसंख्य शाळांनी अद्यापही विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्ण केलेले नाही. काही शिक्षक आपापल्या गावी गेले आहेत. ते आता पुन्हा परत मूळ ठिकाणी येण्यासाठी धडपड करू लागले आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना त्वरित निकाल कळविण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे. सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना फोन, एसएमएस व इतर ऑनलाईन पध्दतीने निकाल कळविणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये व त्यांना उपलब्ध साहित्याच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास सुरु करणे शक्य होईल याचा विचार करावाच लागणार आहे. स्थानिक लॉकडाऊनच्या परिस्थितीनुसार पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना निकालपत्रक देण्यासाठीची आवश्यक कार्यवाही शाळा, महाविद्यालयानी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना द्याव्यात, असे पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.