नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंक आणि अर्थ मंत्रालयाने केलेल्या उपाययोजनामुळे महागाई कमी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आगामी काळात विकास दर वाढविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
इंडिया आयडिया इव्हेंट या कार्यक्रमात बोलताना सितारामन यांनी सांगितले की, रोजगार निर्मितीबरोबरच सर्वांचा समान विकास कसा होईल याकडे केंद्र सरकार लक्ष देणार आहे. परिस्थिती किती खराब असली तरी भारत विकासदरावरील लक्ष विचलित होऊ देणार नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये भारताने करोनाचा आणि जागतिक अस्थिरतेचा सामना केला असला तरी स्थूल अर्थव्यवस्था उत्तम ठेवली आहे. त्यामुळे भारताचा सध्या विकास दर इतर कोणत्या देशापेक्षा जास्त आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने इतर देशापेक्षा वेळीच उपाययोजना केल्यामुळे महागाईचा दर आता कमी झाला आहे.
जुलै महिन्यात महागाईचा दर 6.71 टक्के इतका नोंदला गेला आहे. तो अजूनही रिझर्व्ह बॅंकेने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर महागाई रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे भारतातील महागाई कमी होईल असे त्या म्हणाल्या. या आठवड्यात युरोपची रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार आहे. त्यानंतर महिन्याच्या अखेरीस अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यास भारताचे रिझर्व्ह बॅंक समर्थ आहे.
कोरोना काळात फक्त ज्यांना गरज आहे अशा लोकांना सरकारने मदत केली. त्यामुळे सरकारचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढला नाही. सरकारला पायाभूत सुविधा क्षेत्रावर खर्च करता आला. करोना संपुष्टात आला असतानाच रशिया -युक्रेन युद्ध सुरू झाले. त्यामुळे भारताच्या आयातीवर आणि निर्यातीवर परिणाम झाला. भारताला कच्चे तेल, नैसर्गिक वायू यासाठी पर्यायी स्त्रोताकडे धावपळ करावी लागत आहे. दरम्यानच्या काळात भारताने विविध देशाबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अमेरिकेबरोबर आर्थिक संबंध बळकट झाले आहेत. आणि आगामी काळात येथे बळकट होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.