मुंबई – अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होत असलेल्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यावर शमीला मोहालीला पाठवण्यात आले नसून इंग्लंडवरून राष्ट्रीय क्रिकेट अकदामीत सराव करत तंदुरुस्त ठरलेल्या उमेश यादवला रवाना करण्यात आले आहे. मोहालीतच येत्या मंगळवारी या दोन संघात पहिला टी-20 सामना होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळला जाणार आहे. ऍरन फिंच याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ मोहालीत पोहोचला असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. शमीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या संपूर्ण टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे.
आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत आपल्या कामगिरीतील चुका सुधाराव्यात, अशी बीसीसीआयचा हेतू आहे.
इंग्लंडमधील काउंटी स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर दुखापत झालेला उमेश आता पूर्ण तंदुरुस्त आहे. तो मोहालीत भारतीय संघात दाखल झाला आहे. आशिया करंडक स्पर्धेतील पराभवानंतर निवड समितीला संघात अनुभवी गोलंदाज हवा होता. मात्र, शमीला कोरोना झाल्यामुळे भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश केला गेला आहे. मात्र, यादव गेल्या तीन वर्षांपासून टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. विशाखापट्टणम येथे 2019 साली त्याने टी-20 सामना खेळला होता. या वर्षी जानेवारीमध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेश यादवने भारतासाठी केवळ सात टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 9 बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 158 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 106 बळी घेतले आहेत.