अहमदाबाद – भारत व इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यातही भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतींचे शुक्लकाष्ट अद्याप संपलेले नाही. प्रत्यक्ष सामना सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा भारताचे तीन खेळाडू या मालिकेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले गेले आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, राहुल तेवतिया तंदुरुस्ती चाचणी पार करण्यात अपयशी ठरले असून वेगवान गोलंदाज टी. नटराजनला खांद्याच्या दुखापतीमुळे टी-20 मालिकेला मुकावे लागणार आहे.
वरुण, तेवतिया व नटराजन या तिघांची भारतीय संघात निवड करण्यात आली असली तरी हे तिघेही बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्तीवर मेहनत घेत होते. नवोदित वरुण चक्रवर्तीला काही दिवसांपूर्वी झालेल्या यो-यो चाचणीत निर्धारित वेळेत 2 किलोमीटरपर्यंतचे अंतर गाठण्यात अपयश आले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठीसुद्धा चक्रवर्तीला स्थान देण्यात आले होते; परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. तेवतियासुद्धा पहिल्या तंदुरुस्ती चाचणीत अयशस्वी ठरला आहे.
तेवतियासुद्धा पहिल्या चाचणीत अनुत्तीर्ण झाला असून त्याला दुसरी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत राहुल चहरला भारतीय संघात स्थान मिळू शकते.
डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजनला खांद्याच्या दुखापतीने सतावले आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी नटराजनला किती काळ लागेल, हे स्पष्ट झालेले नाही. फिरकी गोलंदाज राहुल चहर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासूनच नेट गोलंदाजाची भूमिका बजावत आहे. बायोबबल वातावरणातच राहिल्यामुळे त्याचा भारतीय संघातील समावेश पक्का मानला जात आहे.