अहमदाबाद – भारत व इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यांच्या मालिकेत अनेक खेळाडूंना नवनवे विक्रम साकार करण्याची संधी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासमोर कारकिर्दीत अनेक टप्पे पार करण्याची नामी संधी आहे.
सांघिक स्तरावरही या मैदानावर दोन्ही संघांना समान संधी आहे. या दोन संघात आजपर्यंत 14 टी-20 लढती झाल्या असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 7 मध्ये विजय मिळवला आहे. कोहलीने आतापर्यंत 85 सामन्यात 2 हजार 928 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला 3 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 72 धावांची गरज आहे. पाच सामन्यात त्याने या धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. या मालिकेत 17 धावा केल्यावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 12 हजार धावा करणारा तिसरा
कर्णधार ठरेल.
इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत हिटमॅन रोहित शर्मालाही काही कामगिरीचे टप्पे ओलांडण्याची संधी आहे. या मालिकेत रोहितने 13 षटकार मारल्यास आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला जाईल. रोहितने 127 षटकार मारले आहेत.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने रोहितला मागे टाकत हा विक्रम स्वत:च्या नावावर केला होता. आता रोहितला पुन्हा हा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. गुप्टिलने 139 षटकार मारले आहेत.याचबरोबर 67 धावा करताच रोहित गुप्टिलला मागे टाकू शकतो. रोहितने टी-20 मध्ये आतापर्यंत 2 हजार 773 धावा केल्या आहेत.
युजवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये 59 बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराहच्या नावावर ही कामगिरी असून एक बळी घेतल्यावर चहल बुमराहला मागे टाकेल. भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमारला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाल्यास तो आयपीएलमध्ये 100 सामने खेळल्यानंतर भारताकडून पदार्पण करणारा पहिला क्रिकेटपटू ठरेल.