विशाखापट्टणम :– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात सुरु झालेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, एक कर्णधार म्हणून जेव्हा तो पहिल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहीला तेव्हा त्याची प्रचंड नाचक्की झाली. कारण या पत्रकार परिषदेला अवघे दोनच पत्रकार उपस्थित होते.
भारतात गेल्या रविवारीच एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला. त्याच्यानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी पुन्हा नवी मालिका सुरु झाली. विश्वकरंडक स्पर्धेसाठी देशभरातून तब्बल 200 पत्रकार उपस्थित असायचे. मात्र, टी-20 मालिकेपूर्वीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला केवळ दोनच पत्रकार उपस्थीत असल्याने अनेक चर्चांना बळ मिळाले आहे.
सूर्यकुमारला कर्णधार बनवण्यात आल्याचा निषेध म्हणून किंवा बीसीसीआय खेळाडूंना सातत्याने क्रिकेट खेळवत आहे त्यामुळेच माध्यमांनीही ही कृती करुन नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. त्यातच प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे या मालिकेचे महत्वच कमी झाल्याचीही भावना सोशल मीडियावरही व्यक्त होत आहे.
एक दिवस फुगा फुटेल…
बीसीसीआय सातत्याने स्पर्धा व मालिका आयोजित करत आहे. त्यामुळे खेळाडूंनाही सततचा प्रवास करवा लागत आहे. त्यातच मोठी स्पर्धा संपून काही दिवसही लोटले नसताना लगेचच पुन्हा टी-20 मालिका आयोजित करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन मोसमांपासून भारतीय संघ सातत्याने खेळत आहे. याच अतिक्रिकेटचा फुगा एकदा फुटेल व त्यानंतर चाहतेही मैदानांकडे फिरकणार नाहीत, अशी भीतीही विशाखापट्टणमला उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने व्यक्त केली आहे.