ऍडलेड – भारत व यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व चौथा कसोटी सामना अनुक्रमे सिडनी व ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. मात्र, या शहरांतील करोनाचा धोका वाढत असल्याचे समोर आल्यामुळे या सामन्यांच्या ठिकाणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरा कसोटी सामना 26 पासून मेलबर्नच्या मैदानावर सुरू होत असून त्यानंतर होत असलेल्या या दोन्ही कसोटी सामन्यांच्या स्थळाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.
सिडनीमध्ये पुन्हा करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे तिसऱ्या कसोटीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर चौथी कसोटीही कशी आयोजित होईल याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत.
तिसरी कसोटी सिडनीमध्येच होईल, असा विश्वास ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने व्यक्त केला असला तरीही येत्या दोन दिवसांत सर्व परिस्थितीची पाहणी केल्यावरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
यात जर बदल झाला तर ब्रिस्बेनला तिसरी तर, सिडनीला चौथी कसोटी खेळवली जाईल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.