प्रा. दीपककुमार श्रीवास्तव
चौथ्या औद्योगिक क्रांतीची नांदी झाली असून, त्यामुळे जुन्या उद्योगांची आणि जुन्या नोकऱ्यांची जागा नवीन उद्योग आणि नव्या नोकऱ्या घेणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाधारित अशी ही क्रांती असणार आहे. कारखान्यांमध्ये कामगारांचे स्थान कमीच असेल; मात्र विशिष्ट कौशल्यप्राप्त व्यक्तींची गरज भासेल. भारतातील विद्यापीठांनी हे सर्व लक्षात घेऊन संरचनात्मक फेरबदल करणे आवश्यक आहे.
जगभरात सध्या करोनानंतरच्या काळातील विकासाविषयी खल सुरू आहे. गेल्या काही दशकांमध्ये झालेले सामाजिक, आर्थिक तसेच तंत्रज्ञानातील बदल आणि त्यायोगे जागतिक अर्थव्यवस्थेत झालेले बदल विचारात घेऊन त्याच्याशी ताळमेळ साधणारे बदल विद्यापीठांनी घडविणे ही काळाची गरज आहे. उदाहरणार्थ, उद्योग जगतात “इंडस्ट्री-4.0’मुळे मोठी क्रांती घडून येणार आहे आणि त्यामुळे व्यावसायिक वातावरणाला गतिशीलता प्राप्त होणार आहे. या क्रांतिकारी बदलांमध्ये नवे उद्योग आणि नव्या नोकऱ्या येणार असून, जुने उद्योग आणि जुन्या नोकऱ्यांची जागा ते घेतील.
“इंडस्ट्री-4.0′ हा एक नवा शब्द असून, नव्या डिजिटल आणि औद्योगिक तंत्रज्ञानाच्या संदर्भाने तो वापरण्यात आला आहे. यात सायबर-फिजिकल सिस्टिम, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्लाउड कॉम्प्युटिंग, कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, 3-डी प्रिंटिंग, एनर्जी स्टोरेज आणि क्वांटम कॉम्प्युटिंगचा समावेश आहे. इंडस्ट्री-4.0 म्हणजेच चौथी औद्योगिक क्रांती होय. व्यावसायिक वातावरणात या क्रांतीमुळे मोठे फेरबदल होणार आहेत. भविष्यातील उद्योग ऑटोमेशन म्हणजेच आधुनिकीकरणावर आधारित असतील आणि त्यात रोबोटिक्सचा वापर वाढेल. इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानामुळे आपल्या जगण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलून जाईल.
औद्योगिक तंत्रज्ञानाला गतिशीलता प्रदान करणारे हे तंत्रज्ञान असेल आणि त्यामुळे व्यावसायिक वातावरणही बदलून जाईल. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानविषयक क्रांतीमुळे पारंपरिक नोकऱ्यांची जागा आधुनिक उद्योगातील आधुनिक नोकऱ्या घेतील. काळाबरोबर अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची संख्या घटणार आहे. उत्पादन प्रक्रियेच्या आधुनिकीकरणामुळे कारखान्यांमध्ये श्रमिकांसाठी जागा त्याप्रमाणात कमीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु कौशल्याची गरज असलेल्या नोकऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते.
भविष्यात अनेक लोकांना मल्टी-ट्रॅक करिअर करण्याची तसेच अनेक नोकऱ्यांची आवश्यकता असेल. त्यामुळे भारतीय विद्यापीठांसमोर आणि उच्चशिक्षणाच्या क्षेत्रासमोर नवे आव्हान असेल. तसेच ती संधीही असेल. अशा अवस्थेत रोजगारांसाठी एका नव्या प्रकारच्या कौशल्याची आवश्यकता असेल. या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय विद्यापीठांना अभ्यासक्रम, संशोधन, उद्योग इंटरफेस, नेतृत्व, गुणवत्ता आदी गोष्टींसंदर्भात संरचनात्मक फेरबदल करावे लागतील.
भारतातील उच्च शिक्षणाचा ताळमेळ आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या बरोबरीने गेल्या काही वर्षांत व्यावसायिक वातावरणात झालेल्या परिवर्तनाशी बसविणे ही काळाची गरज आहे. भारतात अनेक प्रसिद्ध विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था असून, तेथे प्रतिभांना अजिबात कमतरता नाही.
या प्रतिभेचा वापर चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु अग्रणी विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेऊन तंत्रज्ञानास अनुकूल वातावरण, स्वदेशीच्या मुद्द्यावर उच्च गुणवत्ता असणारे संशोधन आणि उद्योगांशी भागीदारीच्या माध्यमातून जागरूक, सचेत आणि गंभीर प्रयत्न करून रोजगार क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले, तरच हे शक्य आहे. त्यासाठी भारतात उच्च शिक्षण अधिक प्रभावशाली आणि प्रासंगिक बनविण्याची गरज आहे. त्यासाठी अधिक गुंतवणूक आणि प्रयत्न करावे लागणार आहेत.
चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण होणाऱ्या संधी प्राप्त करण्यासाठी आपण तयार राहण्याची गरज आहे. असे करण्यासाठी विद्यापीठांनी व्यापक रोडमॅप तयार करण्याबरोबरच संरचनात्मक परिवर्तनाची रणनीती तयार करायला हवी. यातून चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण केले जाणे गरजेचे आहे.