सातारा – सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा विकास योग्यरित्या झालेला नाही. नवीन उद्योग यायचे नाव घेत नसताना सध्याच्या उद्योगांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवीन “एमआयडीसी’मध्ये तर खुल्या जागांवर कचरा डेपो बनविला आहे, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्यात मोठे उद्योग उभारले जात नसल्याने बेरोजगारीची समस्या प्रचंड वाढली आहे. सातारा शहरालगत जुनी व नवीन एमआयडीसी असून, त्यामध्ये सध्या शेकडो छोटे- मोठे उद्योग सुरू आहेत. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी येथे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देणारे उद्योग आलेले नाहीत. सध्या असलेल्या उद्योगांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
नवीन “एमआयडीसी’मध्ये देगाव फाटा येथून रस्ता आहे. मात्र, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. औद्योगिक वसाहतीमध्येही अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पथदिव्ये लावले असले तरी काही पथदिव्यांचे बल्ब खराब झालेले आहेत. एका ठिकाणी तर चक्क वेलींनी पथदिव्याचा खांब गुरफटून टाकला आहे.
त्या लगतच वठलेले झाड आहे. ते पडून दुर्घटनाही होऊ शकते. सातारा जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षणात (ग्रामीण) देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मात्र, या “एमआयडीसी’त अक्षरश: जागोजागी कचऱ्यांचे ढीग साठलेले पाहण्यास मिळत आहेत. “मास भवना’समोरही कचरा टाकण्यात आला आहे. एका मोकळ्या जागेत कचरा आणून टाकला जात असून, तेथेच तो पेटवून दिला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय, सार्वजनिक शौचालये नसल्याने रस्त्याकडेलाही नागरिक घाण करताना दिसतात. अशा स्थितीवर संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी परिणामकारक भूमिका घेऊन तशा सुचना यंत्रणांना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.