सातारा – सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा आहे. सातारा ही स्वराज्याची राजधानी आहे. अशा सातारा शहर परिसरामध्ये समाज माध्यमांतून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा निंदनीय प्रकार घडला. आपल्या महाराष्ट्रात वारंवार असे प्रकार घडत असून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान भारतीय जनता पक्ष अजिबात सहन करणार नाही, येथून पुढे जर शिवप्रेमींच्या भावना दुखवाल तर खबरदार, असा इशारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिला आहे.
याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे, की छत्रपती शिवरायांची विचारसरणी सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारी आहे. ती समाजात विषमता पेरणारी नाही. त्यामुळे अशा युगपुरुषाचा अवमान करणे चुकीचे आहे. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आहेत. संपूर्ण जगात आदर्श समजले जाणारे राजे आहेत. असे असताना सातारा शहर परिसरातून समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केल्याबद्दल जिल्ह्यात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने समाजविघातक प्रवृत्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती आहे. तसेच प्रशासनाने जर कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.