कोपरगाव: इंदूरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील, त्याचे इतके काय भांडवल करताय. बोलून गेले ते शब्दांचे वारं होते, त्यांना एव्हढे मोठे करण्याचे कारण नाही, असे मत समाजसेवीका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. त्या राहता तालुक्यातील श्रीगणेश शैक्षणीक संकुलाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
इंदूरीकर यांचे कार्य महान आहे. त्यांनी आपल्या प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला काढले आहे. त्यांनी जीवनात हजारो मुलांना सक्षम उभे केले आहे. इंदूरीकर महाराजांचे योगदान समाजासाठी मोठे आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करायचे का? प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी आजवर केलेल्या चांगल्या कष्टावर पाणी फिरवायचे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी इंदूरीकर महाराजांवर टिका करणाऱ्यांना केला आहे.
इंदूरीकर महाराज वक्तव्यावरून झालेला वाद बरोबर नाही. महाराजांनी आपले कार्य चालू ठेवावे. टीका करणाऱ्यांनी शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करावा असेही त्या म्हणाल्या.