मुंबई – परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात यंदाच्या वर्षात सामने होणार असून, त्यामुळे या सामन्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांना पर्वणीच मिळणार आहे. यात आगामी आशिया करंडक तसेच ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. उभय देशांमधील संबंध दहशतवाद आणि सीमेवरील तणावामुळे बिघडले आहेत. त्यामुळे गेल्या दशकभरात या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकही क्रिकेट मालिका खेळवण्यात आली नाही. यंदा हे दोन संघ चार महिन्यांत चार वेळा आमने सामने येण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देश येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. त्यापूर्वीही या दोन्ही संघांमध्ये एक सामना होणार आहे. हा सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. श्रीलंकेत आशिया करंडक टी-20 स्पर्धा यंदा होणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आशिया स्पर्धेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, यंदाची स्पर्धा श्रीलंकेत होणार आहे. ही स्पर्धा 2020 साली पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु करोनाचा धोका वाढल्यामुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 2021 सालीही ही स्पर्धा आयोजित करता आली नाही आणि त्यानंतर आता यंदा श्रीलंकेत 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
आशिया करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोनदा एकमेकांशी खेळण्याची शक्यता आहे. आशिया करंडक स्पर्धा संपल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत असून, त्यात 23 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे मैदान असलेल्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. पण 13 नोव्हेंबरलाही दोघांमध्ये पुन्हा एकदा लढत पाहायला मिळू शकते.