नवी दिल्ली – भारत आणि चीनदरम्यानच्या तणावाचा युक्रेनच्या युद्धाशी संबंध जोडू नये, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर यांनी दुसऱ्यांदा भारताची भूमिका युरोपातील देशांसाठी स्पष्ट केली आहे. भारत काही युक्रेनचा शेजारी देश नाही. भारताने रशियाला दिलेल्या पाठिंब्याचा आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला दिलेल्या पाठिंब्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे जयशंकर यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.
भारताने रशियाकडून तेल आयात करण्यावर युरोपातील काही देशांना आक्षेप आहे. मात्र युरोपातील देशांनी आपल्या देशाला आवश्यक असलेल्या गॅस आणि तेलाची गरज लक्षात घेऊन आणि आपल्या देशातील नागरिकांचा विचार करूनच रशियावर निर्बंध घातले आहेत. युद्धासाठी रशियाला आर्थिक मदत व्हावी म्हणून भारत गॅस आणि तेल खरेदी करत नाही. तर भारताच्या नागरिकांच्या गरजेपुरते तेल आणि गॅस खरेदी करण्यापुरताच पैसा रशियाला दिला जातो आहे, असे जयशंकर म्हणाले. ब्राटिस्लाव्हा परिषदेत ते बोलत होते.
भारताने कोणाशी व्यवहार करावा अथवा करू नये, याबाबत कोणालाही कोणतेही उदाहरण देण्याची गरज नाही. युरोपाच्या समस्या म्हणजे सर्व जगाच्या समस्या आहेत आणि जगाच्या समस्या या युरोपच्या समस्या नाहीत, या समजुतीतून युरोपाने बाहेर पडण्याची गरज आहे, असे जयशंकर म्हणाले.
भारताचे चीनबरोबरचे संबंध अवघड आहेत. पण ते हाताळण्यास आम्ही सक्षम आहोत. पण भारताने केलेल्या व्यवहारांमुळे एक नाही तर दोन संबंधांवर परिणाम होणार असेल, तर अशाप्रकारे जगाचे व्यवहार चालत नाहीत. चीनबरोबरच्या तणावाचा युक्रेनच्या प्रश्नाशी काहीही संबंध नाही. तसेच त्याचा रशियाशीही काहीही संबंध नाही, असे जयशंकर यांनी सांगितले.