दुबई – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या दर्जाबद्दलच आता टीका होऊ लागली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आशिया करंडक स्पर्धेतील रविवारी झालेल्या लढतीत पंत ज्या पद्धतीने रिव्हर्सस्वीपचा फटका मारून बाद झाला. त्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यांत दिनेश कार्तिकला संधी दिली गेली होती. मात्र, रविवारच्या सामन्यात पंतला त्याच्या जागी संघात घेतले गेले. इतक्या सामन्यांनंतर संघात परतलेल्या पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. भारतीय संघाचे तीन फलंदाज बाद झाले होते व त्याने जबाबदारीने फलंदाजी करणे गरजेचे होते मात्र, नेहमीप्रमाणे त्याने आत्मघातकी फलंदाजी केली. तो 12 चेंडूत 2 चौकार फटकावून 14 धावा काढून बाद झाला.
पाकिस्तानचा लेग स्पीन गोलंदाज शादाब खानच्या चेंडूवर असीफ अलीकडे झेल देत पंतने आपली विकेट फेकली. संघाची त्यावेळची स्थिती पाहता सरळ बॅटने संयमी फलंदाजी करणे गरजेचे असतानाही त्याने आवसानघातकी फलंदाजी करत रिव्हर्सस्पीव मारण्याचा प्रयत्न केला व बाद झाला. सातत्याने अशी बेजबाबदार फलंदाजी करत असूनही त्याचे संघातील स्थान कायम कसे राहते, असे संतप्त सवालही नेटकरी करत आहेत.
संघातून हकालपट्टी करा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना इतक्या बेजबाबदार वृत्तीने जर पंत खेळत असेल तर त्याला संघातून हाकललेच पाहिजे. त्याला जीतकी संधी दिली तेवढी जर इशान किशन, संजू सॅमसन यांना दिली तर ते निश्चितच सरस कामगिरी करतील. दिनेश कार्तिकही फिनिशरची भूमिका पार पाडत आहे, त्याला का सारखे वगळले जाते, असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.