आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला आणि लगेचच भारताचा विराट कोहली महान की पाकिस्तानचा बाबर आझम या चर्चात्मक तुलनेला तोंड फुटले. मुळातच ही तुलना कशासाठी व का केली जाते हेच समजत नाही. समकालीन किंवा विषमकालीन खेळाडूंची तुलना ही मानसिक दुर्बलता असल्याचे मला वाटते.
पूर्वी सर डॉन ब्रॅडमन व सर लेन हटन, सर गॅरी सोबर्स व हनिफ महंमद, सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांच्यातही सातत्याने तुलना होत होती. यातील काही समकालीन, तर काही विषमकालीन. मात्र, तरीही कोण महान ही तुलना केली जायची. खरेतर प्रत्येक खेळाडूची शैली, खेळण्याचे तंत्र, मानसिकता, निर्णयक्षमता व सर्वात महत्त्वाची म्हणजे परिस्थिती ही भिन्न असते. बॉडीलाईन गोलंदाजीसमोर ब्रॅडमन खंबीर होते. तसेच वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर गावसकरही खंबीर होते, मग सचिनने ती गोलंदाजी कशी खेळली असती किंवा कोहलीने कशी फलंदाजी केली असती असे प्रश्न पडलेले पाहायला मिळतात.
आता तर काय कोहली श्रेष्ठ की बाबर आझम या चर्चेने जोर धरला आहे. कोहलीने खूप कमी कालावधीत सचिनच्या विक्रमांना गवसणी घालायला सुरुवात केली. त्याची सचिनशीच तुलना होऊ लागली. आता त्याची जागा बाबरने घेतली. बाबरची कारकीर्द आता कुठे सुरू झाली आहे. त्याची प्रगती कशी होते हे पाहिल्यावरच त्याबाबत बोलता येईल. पण तरीही त्यांच्यात तुलना होऊ शकत नाही.
मागे एकदा ब्रायन लाराने सर सोबर्स यांच्या 365 धावांच्या कामगिरीला मागे टाकले. तेव्हा एका ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराने सर व्हिव रिचर्डसला प्रश्न केला की लारा सोबर्सपेक्षा महान बनला का. त्यावर रिचर्डस हसला व म्हणाला, लाराला अजून अल्विन कालिचरणपर्यंत पोहोचायचे आहे, सोबर्स खूप नंतरचा पल्ला आहे. 1998 सालचे चित्र पाहू, सचिन बाद झाला की टीव्ही बंद केले जायचे. आता कोहली बाद झाला तरीही नंतरच्या फलंदाजांवर विश्वास ठेवला जातो.
कोहली बाद झाल्यावरही अन्य खेळाडूंच्या कामगिरीवर भारताने सामने जिंकले जात आहेत. 1990 सालच्या दशकात सचिन बाद झाल्यावर टीव्ही बंद केले जायचे. कारण, नंतरच्या फलंदाजांवर विश्वासच नसायचा. मध्यंतरी गावसकरांनीही सांगितले होते की कोहली व सचिनची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, कोहली एक क्रिकेटपटू आहे तर, सचिन देशवासीयांची भावना.
त्यामुळे काळ कोणताही असो खेळाडूंची, त्यांच्या कामगिरीची तसेच त्यांच्या क्षमतेची तुलना करणे योग्य नाही. आताच्या काळात कोहली काय किंवा बाबर काय त्यांच्या संघासाठी कशी खेळी करतात व भविष्यात कोण वर्चस्व राखतो तोच महान ठरणार, मग विनाकारण तुलना कशासाठी?