संगमनेर – संगमनेरमध्ये स्वागतासाठी लोकांचा वेगळा उत्साह पहायला मिळत असून लोक जसे पारतंत्र्यात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यासारखा लोकांचा उत्साह पाहायला मिळाला. जनतेला आधार देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री विखे पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. जेष्ठ नेते वसंतराव गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, बापुसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख जावेदभाई जहागिरदार उद्योगपती मनिष मालपाणी अमोल खताळ डाॅ.सोमनाथ कानवडे, शिवाजीराव धुमाळ महीला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी,डाॅ. भानूदास डेरे, विक्रमसिंह खताळ, सतिष कानवडे, भाजयुमोचे श्रीराज डेरे, दिपेश ताटकर, माजी नगसेविका मेधा भगत, शिरीष मुळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात फक्त केंद्राकडे बोट दाखव्याण्याचे काम राज्य सरकारने केले. इतके भ्रष्टाचारी सरकार देशाच्या जनतेने पाहिले नसेल. सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा समान विकासाचा कार्यक्रम आहे, असे हे महाविकास आघाडी सरकार घेऊन आले. मात्र फक्त महावसुलीचा कार्यक्रम राबविला. तसेच आता काँग्रेस मध्ये फक्त दोन- चार लोक शिल्लक राहतील. काँग्रेस पक्षाला जनाधार राहिला नाही, नेते राहिले नसल्याची टीका ही मंत्री विखे यांनी यावेळी केली.
भ्रष्टाचाराला या सरकारमध्ये थारा नाही. वाळू माफियांना थारा नाही. भाऊबंदकी लावून द्यायची. वाळू माफियांना वेसण घालण्यासाठी विशिष्ट धोरण आणणार. आता अमुक कार्यालयातून फोन आल्यावर काम होईल असे राहणार नाही. आता फक्त भारतीय जनता पार्टी चे कार्यालय कार्यान्वीत करण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असल्याचे आश्वासित करून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाकरीता प्रधानमंत्री ग्रामासडक योजना सुरू करताना मागील सरकारच्या काळात फक्त घोषणा झाल्या परंतू अंमलबजावणी नव्हती. मात्र आता लोकांसाठी काम करणारे सरकार आले आहे. आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला नव्हे कामाला प्राधान्य असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.
निळवंडे कालव्यांच्या संदर्भात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पहील्या वीस किलोमीटरमध्ये कामाची सुरूवात झाल्यामुळे पुढची काम सुरू झाली.अनेकजण आपल्या सह्याचे फ्लेक्सबोर्ड लावून पाणी देणार सांगत होते. परंतू निळवंडे कालव्यांच्या कामाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस आणि मधुकरराव पिचड यांचे असल्याचा आवर्जून उल्लेख करतानाच कालव्याचा कामाचा आढावा घेवून लाभक्षेत्रात पाणी देण्यास सरकार कटीबध्द राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहीती जनतेला जावून सांगा, मागील अडीच वर्षात मोदीजींनी घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येकजण लाभार्थी आहे. या कामाची माहीती कार्यकर्त्यांनी गावोगावी जावून सांगा, कारण योजना आपल्या आणि श्रेय दुसरेच घेतात याची जाणीव ठेवा. आगामी निवडणुकांचा आपला अजेंडा हाच असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रतशित भाजप करण्याची तयारी करण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले.