दुबई – मला मानसिकदृष्ट्या खूप दृढ आणि मजबूत समजले जाते; परंतु प्रत्येकाला मर्यादा असतात. याच मर्यादा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. मात्र, हे आपल्यासाठी हानिकारक ठरते. मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. हे मान्य करण्यास मला कसलीही लाज वाटत नाही, असे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोहली मेन्टल हेल्थवर भाष्य केले. विराट कोहली म्हणाला, मानसिकदृष्ट्या खचणं ही साधारण गोष्ट आहे, जी आपण स्वीकारली पाहिजे. कमकुवत असल्याचे कबूल करण्यापेक्षा मजबूत असल्याचे दाखवणे हे फारच वाईट आणि घातक आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्येही मला कधी कधी एकटेपणा जाणवतो, असेही कोहली यावेळी म्हणाला.
दरम्यान, विराट कोहलीला तीन वर्षांपासून फॉर्मशी संघर्ष करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आले नाही. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटचे शतक झळकावले होते. आता आशिया चषकात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.