नवी दिल्ली – जागतिक लोकशाही सूचीमधील क्रमवारीत भारताची १० अंकांनी घसरण झाल्याचा एक अहवाल नुकताच सादर करण्यात आलाय. २०१९ या वर्षासाठी ही यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १६७ देशांचा समावेश आहे. ब्रिटन स्थित द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिक वृत्तपत्राच्या ‘इंटेलिजन्स युनिट’द्वारे सादर करण्यात आलेल्या या अहवालामध्ये भारतातील ‘नागरी स्वातंत्र्यात घट’ झाल्याने भारताची क्रमवारी घसरल्याचं म्हंटलं आहे.
द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ही जगभरातील अनेक देशांमधील राजकीय व आर्थिक परिस्थितीच्या संशोधन व विश्लेषणाद्वारे अहवाल सादर करणारी संस्था आहे. या संस्थेद्वारे सादर करण्यात आलेला जागतिक लोकशाही सूची अहवाल हा त्या देशातील निवडणूक प्रक्रिया, वैविध्य, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती, आणि नागरी स्वातंत्र्य या मुद्द्यांच्या आधारे तयार केला जातो.
दरम्यान, २०१८ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या जागतिक लोकशाही सूचीमध्ये भारत ७.२३ गुणांसह ४१व्या स्थानी होता. मात्र २०१९ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालात भारताला ६.९० गुण मिळाल्याने भारताची ५१व्या स्थानावर घसरण झाली.
‘शेजऱ्यांची’ क्रमवारी…
जागतिक लोकशाही सूची अहवालामध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचे स्थान अव्व्ल असून श्रीलंका (६९) बांगलादेश (८०), पाकिस्तान (१०८) तर चीन (१५३) व्या स्थानावर आहेत.