नवी दिल्ली – सन 1947 च्या सुमारास भारत, चीन आणि दक्षिण कोरियाचे दरडोई उत्पन्न समान होते. मात्र गेल्या 75 वर्षात इतर देश योग्य आर्थिक धोरणामुळे आपल्या कितीतरी पुढे गेले आहेत. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न केवळ 2,000 डॉलर आहे तर दक्षिण कोरियाचे दरडोई उत्पन्न हे आपल्या 7 पट म्हणजे 14 हजार डॉलर इतके आहे.
भारत आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये निर्माण झालेली ही तफावत दूर करण्यासाठी आपण योग्य आर्थिक धोरणांच्या आधारावर काम केले तर 2047 पर्यंत भारत उच्च उत्पन्न गटात सामील होऊ शकतो असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.
भारताला 2047 पर्यंत उच्च उत्पन्न गटात सामील व्हायचे असेल तर दीर्घकाळ आपला विकासदर नऊ टक्के पेक्षा जास्त असण्याची गरज असल्याचे कांत यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. भारतामध्ये 1947 नंतर सार्वजनिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित करून त्यामध्ये सरकारने भांडवल गुंतविले. मात्र याचा योग्य परतावा मिळाला नाही.
1991 नंतर खासगी क्षेत्र खुले करण्यात आले असून खाजगी क्षेत्राच्या पुढाकारामुळे गेल्या तीस वर्षांमध्ये भारताची प्रगती होण्यास मदत झाली आहे. जर खासगी क्षेत्राची मदत घेऊन विकास केला तर 2047 पर्यंत आपली परिस्थिती सुधारू शकेल असे कांत यांनी सांगितले.
1947 च्या सुमारास बऱ्याच देशाची परिस्थिती भारतासारखीच गरीब होती. मात्र जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, रशिया इत्यादी देश दरडोई उत्पन्नात भारताच्या पुढे गेले आहेत. भारत सध्या मध्यम उत्पन्न गटाच्या देशात येतो. भारताची लोकसंख्या जास्त आणि अकुशल असल्यामुळे आपल्याला वेगात उच्च उत्पन्न गटात जाता येत नाही. मात्र आपण नेटाने प्रयत्न केले तर पुढील 25 वर्षात परिस्थिती सुधारू शकते असे त्यानी सांगितले.
1975 नंतर चीन, दक्षिण कोरिया, तैवान इत्यादी देशांचा विकास दर अनेक वर्ष दहा टक्के होता. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती आर्थिक धोरणे अवलंबिली होती. मात्र आपण या काळात आत्मपरीक्षण करण्यास उशीर केला आणि आपल्याला नवे धोरण स्वीकारण्यासाठी 1991 साल उजाडले होते. आपण पुढील 25 वर्षांमध्ये उच्च उत्पन्न गटात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला नाही तर आपण कमी उत्पन्न गटाच्या रहाटगाडग्यात अडकून राहू शकतो. अशा प्रकारचा इशारा अगोदर अनेक तज्ञांनी दिलेला आहे.
नौकरशाहीमुळे उद्योजकता खुंटली
भारतात उद्योजकता उद्योजकता खुंटल्यामुळे विकास झाला नाही. ही उद्योजकता खुंटविणण्याचे काम भारतातील नोकरशहानी नियमांचा गैरवापर करून केले आहे. या नोकरशहांनी जर आगामी काळात मानसिकता बदलली आणि खासगी क्षेत्राला चालणा दिली तर भारतातील सर्व क्षेत्रांचा विकास वेगात होऊ शकतो असे कांत यांनी सांगितले.