नवी दिल्ली – संपूर्ण जगभरामध्ये पसरलेल्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इतर देशांसाठीही अनेक उपाय योजना केल्या आहेत आणि मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय नौदलाचे “केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी मदत सामग्री घेऊन आज रवाना झाले.
मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मॅडागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी”केसरी’ जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामग्री, कोविड-19 महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या एचसीक्यू औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक आज पाठवण्यात आले. कोविड-19 महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटांशी सामना करण्यासाठी भारताच्या या मित्र देशांपुढे अनेक समस्या आहेत; हे जाणून, त्याचबरोबर या देशांशी असलेले दृढ ऋणानुबंध लक्षात घेवून भारताने “मिशन सागर’ सुरू केले आणि मदत सामग्री पाठवली आहे.
आपल्याबरोबरच क्षेत्रीय शेजारी राष्ट्रांचा विकास होणे आवश्यक आहे, असा दृष्टिकोन पंतप्रधानांचा आहे. म्हणून “सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ म्हणजेच- “सागर’ असे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. “मिशन सागर’ या मोहिमेची जबाबदारी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सरकारमधल्या इतर संबंधित संस्था- विभाग मिळून संयुक्त समन्वयाने पार पाडत आहेत. “मिशन सागर’ मोहिमेवर गेलेले भारतीय नौदलाचे “केसरी’ जहाज मालदीव प्रजासत्ताकातल्या माले बंदरात प्रवेश करणार आहे. तिथे 600 टन अन्नसामग्री देण्यात येणार आहे.