नगर – भाजीबाजार, दारूची दुकाने किंवा बॅंकांमधील गर्दीपेक्षा नगरच्या कापड बाजारातील दुकाने निश्चितच सुरक्षित आहेत. शिवाय येथून दारूच्या विक्रीइतकाच महसूल व उत्पन्न सरकारला मिळेल. त्यामुळे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या नगरच्या कापड बाजारातही दुकाने उघडण्यास काही अटी व शर्तीनुसार परवानगी मिळावी, अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव देडगावकर, सचिव किरण व्होरा व खजिनदार संजय भंडारी यांनी व्यापाऱ्यांच्यावतीने ही भूमिका मांडली आहे. नगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. थोड्याच दिवसांत नगर जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाण्याची अपेक्षा आहे. त्यात नगरमध्ये केवळ एकल दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. उपनगरातील आणि शहराच्या हद्दीबाहेरील बरीचशी दुकाने अधिसूचनेत नमुद केलेल्या एकल दुकानाच्या व्याख्येत बसत नाही. तरी देखील ती उघडली जात आहेत. त्यास आमचा आक्षेप नाही. मात्र, हा कापडबाजारातील व्यापाऱ्यांवर अन्याय आहे, अशी भूमिका असोसिएशनने पत्रात व्यक्त केली आहे.
अटी व शर्तीनुसार कापडबाजार उघडण्यास परवानगी दिल्यास नोकरवर्ग आणि ग्राहकांची देखील करोना सुरक्षिततेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि नियमांप्रमाणे योग्य ती काळजी घेऊ, अशी हमी असोसिएशनने दिली आहे. नगरचा कापडबाजार बंद राहिल्यास अर्थचक्र कोलमडून पडेल. एकतर अनेक व्यपाऱ्यांकडे नोकरवर्ग आहे. त्यांना पगार देणे सुद्धा अडचणीचे होईल. शिवाय यातून अपेक्षित असलेला महसूल सरकारला मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यातही दुकाने उघडण्यास सकाळी दहा ते सायंकाळी पाच, एवढीच वेळ द्यावी. जेणेकरुन उन्हामुळे जास्तीची गर्दी होणार नाही. बाजारपेठेतील दुकाने उघडून व्यापार सुरू झाला, तरच तेथील कार्यरत कामगार वर्गास काम मिळेल. त्याद्वारे त्यांचे अर्थाजन वाढेल. व्यापाऱ्यांनाही त्यांचे वेतन देण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल, अशी भूमिका असोसिएशनचे स्पष्ट केली आहे. गेल्या 19 मार्चपासून दुकाने अखंडीतपणे बंद आहेत. त्यामध्ये मार्च समाप्तीनंतरचा स्टॉकही घेतलेला नाही. बरेच दिवस दुकान न उघडल्याने साचलेली धूळ व साफसफाई करणे आवश्यक आहे. कारखाने, बांधकाम व्यवसाय, कार्यालये, बॅंकिंग, दारूची दुकाने, एकल दुकाने, शेती मालाची विक्री करणारी दुकाने, शेती कामे, हार्डवेअर वगैरे मालाची दुकाने व अनेक उद्योगांना परवानगी दिली जात असताना केवळ बाजारपेठेतील दुकाने उघडण्यासच का परवानगी दिली जात नाही, याचे आश्चर्य वाटते, अशी खंतही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसमवेत किमान एक बैठक घेऊन चर्चा करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
कोल्हापूर, लातूरप्रमाणे करता येईल नियोजन
कोल्हापूर, लातूरसह महाराष्ट्रात काही ठिकाणी अटी व शर्तीनुसार दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तशीच परवानगी नगरमधील कापडबाजारातील दुकाने उघडण्यास देता येईल, असाही प्रस्ताव असोसिएशनने सुचविला आहे. काही मार्गदर्शक तत्वे ठरवून देता येऊ शकतील. त्यात सम-विषम तारखांना परवानगी देणे, एका-आड एक दुकानास परवानगी देणे, अशी परवानगी देता येऊ शकते, असा प्रस्ताव व्यापारी असोसिएशनचे दिला आहे.