कोलकाता – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाचेच पारडे आजपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत जड राहणार आहे. या दोन संघात आज होत असलेली लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज असून, एकदिवसीय मालिका जिंकल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वासही दुणावला आहे.
– लोकेश राहुल व अक्सर पटेलची दुखापतीने माघार
– नवोदित रवी बिष्णोईला पदार्पणाची संधी
– विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष
– खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन
– दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांना मिळेल स्विंग
– 170 ते 180 धावा पुरेशा
भारतीय संघाची फलंदाजी एकदिवसीय सामन्यांच्या संघापेक्षा टी-20 संघाकडे पाहिल्यास जास्त भक्कम आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड व ऋषभ पंत अशी तगडी फौज भारताकडे आहे.
गोलंदाजीतही दीपक चहर व शार्दुलच्या जोडीला महंमद सिराज, हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल व आवेश खान अशी संमिश्र ताकद भारतीय संघाकडे आहे. या उलट वेस्ट इंडीजचा संघ एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे मानसिकरीत्या खचलेला आहे. नियमित कर्णधार कॅरन पोलार्ड दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरल्याने संघात परतला आहे. एकदिवसीय मालिकेत त्याची उणीव त्यांना जाणवली होती.
त्याच्या जोडीला निकोलस पूरन, फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, ओडेन स्मिथ, शाय होप, अकिल हुसेन असे फलंदाज असूनही त्यांना भारतीय गोलंदाजीसमोर यश आले नाही. आता टी-20 मालिकेतही ते कशी फलंदाजी करतात यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे.
गोलंदाजीत त्यांच्याकडे रोस्टन चेस संघात परतल्याने त्यांची ताकद वाढली आहे. मात्र, शेल्डन कोट्रेल व जेसन होल्डर वगळता त्यांच्या अन्य गोलंदाजांची कामगिरी कशी होते हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.