लखनौ – टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक हुकले मात्र, इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 2 बाद 199 धावा केल्या.
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय भारताच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवताना वादळी फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने इशान किशनसह संघाला शतकी सलामी दिली. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच मार्टीन गुप्टीलच्या सर्वाधिक धावांना मागे टाकत ही कामगिरी आपल्या नावावर कोली. मात्र, तो 32 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 44 धावा करून बाद झाला. त्यानंतर इशानने लखनौच्या मैदानावर वादळ निर्माण केले. चौकार व षटकारांची आतषबाजी करत त्याने श्रेयस अय्यरसह संघाला दीडशतकी मजल मारून दिली.
थाटात अर्धशतक पूर्ण करणारा इशान शतक साकार करेल असे वाटत असतानाच 89 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 56 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 3 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर आलेल्या रवींद्र जडेजाने अय्यरला सुरेख साथ देत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
अय्यरने इशानचा कित्ता गिरवताना आक्रमक फलंदाजी केली. त्याने 28 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या. जडेजा 3 धावांवर नाबाद राहिला. भारताने मर्यादित 20 षटकांत 2 बाद 199 धावा केल्या व श्रीलंकेला विजयासाठी 200 धावा करण्याचे लक्ष्य ठेवले.
संक्षिप्त धावफलक – भारत – 20 षटकांत 2 बाद 199 धावा. (रोहित शर्मा 44, इशान किशन 89, श्रेयस अय्यर नाबाग 57, रवींद्र जडेजा नाबाद 3, दासून शनाका 1-19, लाहिरू कुमारा 1-43).