गुडगाव – गणेश सतीशच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाने महाराष्ट्राविरुद्ध पहिल्याच दिवशी वर्चस्व मिळवले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 270 धावा अशी भक्कम मजल मारली आहे.
विदर्भचा कर्णधार फैज फैजलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचा प्रमुख गोलंदाज मुकेश चौधरीने त्यांना लागोपाठ 2 गडी बाद करत धक्के दिले तेव्हा त्यांची स्थिती 2 बाद 18 अशी बिकट बनली होती. मात्र, त्यानंतर अथर्व तायडेने गणेश सतीशसह संघाचा डाव सावरला व भक्कम स्थिती प्राप्त करुन दिली.
तायडे चांगला खेळत होता, त्याने अर्धशतकही पार केले होते मात्र, विनाकारण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 68 धावांवर परतला. बाद होण्यापूर्वी तायडेने गणेशसह तिसऱ्या गड्यासाठी 177 धावांची भक्कम भागीदारी केली. त्यानंतर गणेशने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली व दमदार शतक साकार केले. त्याने एक बाजू लवून धरताना महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने अक्षय वाडकरच्या साथीत पुन्हा एकदा संघाचा डाव स्थिर केला व अडीचशे धावा उभारुन दिल्या.
गणेशने आपल्या नाबाद 146 धावांच्या खेळीत 282 चेंडूंचा सामना करताना 19 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. वाडकरने आपल्या नाबाद 35 धावांच्या खेळीत 76 चेंडूत 6 चौकार फटकावले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 75 धावांची अखंडीत भागीदारी केली. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने 2 तर, सत्यजीत बच्छावने 1 गडी बाद केला.