मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. 26 फेब्रुवारी रोजी संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. आपण हे उपोषण कशासाठी करत आहोत, हे देखील संभाजीराजे यांनी 21 फेब्रुवारी रोजी जाहीर केले आहे. मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. संभाजीराजे यांच्या उपोषणापूर्वी त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभत्कोणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे देखील उपस्थित होते.
दरम्यान, आज संभाजीराजे यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला एक आवाहन केलं आहे. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसायचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.