नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले असून महासंघात तसेच जगभरातील कोणत्याही फुटबॉल संघटनेत राजकीय तसेच अन्य त्रयस्थ व्यक्ती वा संघटनांचा हस्तक्षेप असेल तर पिफा हा निर्णय घेते.
येत्या महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे फिफाने म्हटले आहे. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे मंगळवारी कोलकातात ड्युरंड चषक स्पर्धा सुरू झाली असून त्यात या स्पर्धेत इंडियन सुपर लीगमधील तब्बल 11 क्लब सहभागी होणार आहेत. याच महिन्यात फिफाने त्रयस्थ पक्षाच्या हस्तक्षेपाबद्दल फिफाने महासंघाला निलंबनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सर्वांच्या सहमतीनंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यजमानपदही धोक्यात
फिफाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा हक्क काढून घेण्याची धमकीही दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफला निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून 28 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. जर फिफाने भारतीय महासंघाच्या विनंतीला मान्य केले तरच हे निलंबनही मागे घेतले जाईल. मात्र, सध्यातरी या स्पर्धेचेही यजमानपद धोक्यात आले आहे.
स्पर्धा पुढे ढकलली जाणार
17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक 11 ते 30 ऑक्टोबरदरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव होता. त्याच्या यशस्वी यजमानपदासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली होती. मात्र, आता फिफाच्या निर्णयामुळे 11 ते 30 ऑक्टोबरदरम्यान होणारी 17 वर्षांखाली महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.