नवी दिल्ली – फिफाने लावलेली बंदी मागे घेण्याची चर्चा एकीकडे सुरू असतानाच प्रशासकीय समिती बरखास्त केल्यामुळे जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लावलेली बंदी मागे घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार भारतात होणारी 17 वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचाही मार्ग खुला होणार आहे.
भारतीय महासंघाची निवडणूक येत्या 2 सप्टेंबरला होणार असून त्यानंतर भारतातच या विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा येत्या 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. निवडणूक त्याआधी होणार असल्यामुळे फिफाकडून भारतावरील निलंबन मागे घेण्यात येईल हे जवळपास निश्चित झाले आहे.
भारतीय महासंघाने घटना दुरुस्ती करत खेळाडूंना मतदानाचा बहाल केलेला हक्क काढून घेतला तसेच प्रशासकीय समितीही रद्द केली. त्यामुळे फिफाच्या सर्व अटी मान्य केल्याने फिफानेही चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निवडणुकीत उमेदार म्हणून इच्छुक असलेल्यांना आजपासून (गुरुवार) अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत शनिवारपर्यंत ठेवण्यात आली आहे.
रविवारी या अर्जांची छाननी केली जाणार असून 29 ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दिली गेली आहे. निवडणूक अधिकारी येत्या 30 ऑगस्ट रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करतील व महासंघाच्या राजधानीतील कार्यालयात येत्या 2 सप्टेंबरला निवडणूक होईल. त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केले जातील.