मुंबई – शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबंधी माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात आज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत चांगल्या वानांची बियाणे, पीक विमा, किटक नाशके, खते, शासनाच्या कृषी योजना, नवनवीन कृषी संशोधन यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना गावागावात जाऊन द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, असे सत्तार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या वानाची माहिती, खत कोणते वापरावे, कृषी संबंधी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल यासंबंधीची माहिती द्यावी. ग्रामसभा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी कृषीसहायकांना आराखडा आखून देण्यात यावा, अशा सूचनाही कृषी मंत्र्यांनी केल्या. अतिवृष्टी आणि किड प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्वरीत पंचनामे करुन त्यासंबंधीचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.