झुरिच/नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) घातलेली बंदी नुकतीच तातडीने उठविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासक समिती नेमण्याचा आदेश रद्द केल्यानंतर फिफाने बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत इंडियन फुटबॉलने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती दिली. यावेळी फिफाकडून बंदी उठवण्याबाबतचे आलेले पत्रदेखील त्यांनी ट्विटमध्ये जोडले आहे.
फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भारतीय फुटबॉल क्लब्जना परदेशातील स्पर्धांत खेळणे अवघड झाले होते. याशिवाय यंदा ऑक्टोबर महिन्यात होणारा 17 वर्षांखालील महिला विश्वचषकदेखील भारतात होणार नाही असे समोर येत होते. पण आता ही बंदी उठवल्यामुळे ही भव्य स्पर्धाही भारताला होस्ट करण्याची संधी पुन्हा मिळाली आहे. ही स्पर्धा दि. 11 ते 30 ऑक्टोबरदरम्यान नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतात पार पडणार आहे.
एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार गृहीत धरण्यासाठी स्थापन केलेल्या प्रशासकांच्या समितीचा आदेश संपुष्टात आला आहे आणि एआयएफएफ प्रशासनाने एआयएफएफच्या दैनंदिन व्यवहारांवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे, याची पुष्टी फिफाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, भारतीय फुटबॉलमध्ये सुरू झालेला संपूर्ण वाद एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावरून सुरू झाला होता. यानंतर न्यायालयाने मे 2022मध्ये संपूर्ण बोर्ड रद्द केले होते आणि नवीन घटना तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यानंतरही योग्य निर्णय न झाल्याने फिफाने बंदी घालण्याचा निर्णय
घेतला होता.