लंडन -भारताने बॉर्डर-गावसकर मालिका जिंकूनही, फिरकीला अनुकूल ट्रॅकवर त्यांच्या संथ गोलंदाजांच्या यशावर स्वार होऊनही भारताचे वेगवान गोलंदाज कसोटी विजेतेपदाच्या अंतिम सामन्यात ड्यूक्स बॉल्सच्या सहाय्याने बलवान ठरतील आणि सीम बॉलिंगला अनुकूल परिस्थिती असेल असे वाटते, असे मत ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन याने व्यक्त केले आहे.
भारताने या प्रतिष्ठेच्या लढतीसाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट या वेगवान चौकडीचा समावेश केला आहे, तर अष्टपैलू शार्दुल ठाकूरदेखील ओव्हलवर चमत्कार दाखवू शकतो. लाबुशेन म्हणाला की, दोन महिन्यांपूर्वी आम्ही भारताविरुद्ध खेळलो आहोत. ड्यूक्स बॉल त्यांच्या हातात असल्याने भारतीय वेगवान गोलंदाज त्यांचे कौशल्य अधिक दाखवू शकतील. त्यामुळे त्यांना जाणून घेण्याच्या दृष्टीने आणि ते काय करतात याबद्दल आमची योजना तयार झाली आहे, असे लाबुशेनने सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा कसोटी फलंदाज मार्नस लाबुशेन याला वाटते की, इंग्लिश कौंटी संघ ग्लॅमार्गनसोबतच्या दीर्घ स्पर्धात्मक अनुभवामुळे भारताविरुद्ध 7 जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम सामन्याच्या आव्हानासाठी पूर्णपणे तयार होण्यास मदत झाली आहे. ऍशेससह दोन मालिकांसाठी संघाचा एक भाग असलेले आघाडीचे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यात व्यस्त असताना, जगातील नंबर 1 क्रमांकावर असलेला कसोटी फलंदाज लाबुशेन या सामन्यासाठी तयारी करत होता. डब्ल्यूटीसी फायनल आणि ऍशेसमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कौंटी क्रिकेट खेळत आहे.
वॉर्नरची खेळी निर्णायक
गेल्या काही कसोटींमध्ये फारशी चमकदार कामगिरी न करू शकलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरबाबत त्याचा सहकारी फलंदाज उस्मान ख्वाजाला मोठ्या आशा आहेत, ख्वाजा म्हणतो की, एका मोठ्या खेळीसाठी वॉर्नरचे हात शिवशिवत आहेत आणि अंतिम फेरीच्या सामन्यात त्याला जर अशी खेळी साकारता आली, तर ती निर्णायक असू शकते, असे त्याच्या नेटमधील सरावावरून जाणवते.
कसोटी क्रिकेटच्या जागतिक विजेतेपदासाठी ऍडिलेड ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन दिग्गज संघ 7 जूनपासून एकमेकांसमोर खडे ठाकणार आहेत. सध्या दोन्ही संघांचा जोरदार सराव सुरू आहे. ख्वाजा म्हणतो की, आता कसोटी विजेतेपद आणि पाठोपाठ येणारी ऍशेस मालिका जिंकल्याशिवाय वॉर्नर गप्प बसेल असे वाटत नाही.
त्यासाठी तो कडक इंग्लिश उन्हाळ्यामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी कसून सराव करत आहे. वॉर्नरचा कसोटी जेतेपदाची लढत आणि पहिल्या दोन ऍशेस कसोटींसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश आहे. निवडकर्त्यांनी मार्कस हॅरिस आणि मॅट रेनशॉ यांना पर्याय म्हणून निवडले आहे;
परंतु ख्वाजाला वाटते की, वॉर्नरसारखा अनुभवी क्रिकेटपटू प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्यास, तो सर्वोत्तम कामगिरी करेल. वॉर्नरने गेल्या डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार द्विशतक झळकावण्याव्यतिरिक्त अलीकडील सामन्यांमध्ये धावांसाठी संघर्ष
केला आहे.
कांगारूंना भीती शुभमनची? : रिकी पॉंटिंग
कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांनी कांगारू खेळाडूंची झोप उडवली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने म्हटले आहे की, शुभमन गिल आणि मोहम्मद शमी भारताला चॅम्पियन बनवू शकतात.
शुभमनचा क्लास आणि शॉटची निवड त्याला संघात महत्त्वाची भूमिका देते. पॉंटिंगला वाटते की, शुभमन हा एक उत्कृष्ट युवा खेळाडू आहे. त्याच्यात ती आक्रमकवृत्ती आहे आणि त्याच्यात थोडी चकमकही आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे. त्याचा फ्रंट फूट पुल शॉट, जो तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळतो, तो ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध आवश्यक असू शकतो.