कोलंबो – शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून नुकतीच उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडली आहे. पाहुण्या भारताने या वनडे मालिकेत यजमान श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला आहे.
यानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी टी20 मालिकेवर लागले आहे. या मालिकेला आज, 25 जुलै रोजी प्रारंभ होत आहे. या सामन्यातून भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.
वनडे मालिकेप्रमाणे टी-20 मालिकेतही 3 सामने खेळवले जाणार आहेत. एक दिवसाआड एक हे सामने रंगणार आहेत. 25 जुलै रोजी पहिला टी20 सामना झाल्यानंतर 27 जुलैला दुसरा आणि 29 जुलैला तिसरा व शेवटचा टी20 सामना होणार आहे.
हे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडणार आहेत. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता या सामन्यांना सुरुवात होणार आहे.