नवी दिल्ली – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी भारत-संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार (सीईपीए) 1 मे 2022 रोजी कार्यान्वित होईल असे म्हटले आहे.
भारत-यूएई सीईपीए, या विषयावरील, व्यवसाय-ते-व्यवसाय (B2B) बैठकीला संबोधित करताना ते सोमवारी दुबईत बोलत होते. हा ऐतिहासिक करार नव्या अध्यायाची सुरुवात असून, असाधारण फलश्रुती आणि आपल्या व्यापार संबंधांमध्ये तो एक आदर्श परिवर्न घडवून आणेल असे गोयल म्हणाले.
भारत, यूएईकडे आफ्रिका, इतर जीसीसी(आखाती सहकार्य परिषद देश) आणि मध्य पूर्वेतील देश, सीआयएस देश तसेच काही युरोपीय देशांचे प्रवेशद्वार म्हणून पाहत असल्याचे गोयल म्हणाले.
“हा करार जगभरातील महत्त्वाच्या बाजारपेठांचे दरवाजे खुले करणारा आहे . म्हणून जेव्हा आम्ही या मुद्यावर एकमेकांशी व्यवहार करायचे ठरवले, तेव्हा युएईमधील 10 दशलक्ष लोकसंख्येशीच नव्हे, तर फारच मोठा पट आमच्या नजरेसमोर होता. सीईपीए, उभय पक्षांना खूपच मोठी व्यवसाय संधी उपलब्ध करणार आहे असे गोयल यांनी या बैठकीत सांगितले. यावेळी यूएईचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री, थानी अल झेयोदी उपस्थित होते.
व्यापार आणि सेवांचा समावेश असलेल्या,भारत-यूएई सीईपीए व्यापार करारावर 88 दिवसांच्या विक्रमी अल्पावधीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या वस्तुस्थितीसह अशा अनेक बाबी आहेत ज्या पहिल्यांदाच होत आहेत असे गोयल यांनी नमूद केले.
“हा करार केवळ व्यापाराविषयी नाही, तो केवळ वस्तू आणि सेवांच्या व्यापाराविषयी नाही; मला वाटते की यात प्रचंड भू-राजकीय, आर्थिक आणि युएईमधील भारतीय नागरीकांची विशाल उपस्थिती लक्षात घेता यात एक महान मानवी मूल्यदेखील आहे”, असे गोयल म्हणाले.
भारत-यूएई भागीदारी “21 व्या शतकातील परिभाषित धोरणात्मक भागीदारी” असल्याचे त्यांनी सांगितले. हा करार या नात्याला एक नवी दिशा देतो, एक परिवर्तन घडवून आणतो, असे ते म्हणाले.
भारत-यूएई सीईपीए, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या संकल्पनेवर आधारित आहे. भारताने 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स निर्यातीचे ध्येय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले असून यासाठी भारताला युएईच्या बाजारपेठेत मोठा वाटा हवा आहे , गोयल म्हणाले.
“दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये सेवांच्या वाढत्या भूमिकेमुळे, हा करार द्विपक्षीय प्रतिबद्धतेला आगामी वर्षांमध्येही बळ देईल” असे ते म्हणाले. यूएईने भारतीय पायाभूत सुविधा, उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या स्वारस्याबद्दल वचनबद्धता व्यक्त केली आहे. यूएईच्या उद्योजकांच्या एका मोठ्या शिष्टमंडळाने नुकतीच जम्मू कश्मीलाही भेट दिल्याचे गोयल यांनी सांगितले.