नवी दिल्ली – भारत संपूर्ण जगाला धर्माचा मार्ग दाखवत आहे. हिंदू धर्मात वेगवेगळे पंथ असले तरी प्रत्येकजण एकच काम करत असतो. धर्म सर्वांना एकत्र ठेवतो. धर्म हा शाश्वत आहे, तो संपला तर विश्वाचाही अंत होईल. त्यामुळे कार्यक्षमतेने काम करा. तुमच्यात अहंकार कधीही आणू नका. शुद्धता आवश्यक आहे. भगवत गीतेमध्ये भारतीय जीवनाचे सार आहे. माणसामध्ये भक्ती, दान आणि त्यागाची भावना असली पाहिजे. तुम्ही जे काही कराल ते चांगलेच असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (dr mohan bhagwat) यांनी केले.
सहारनपूर जिल्ह्यातील सरसावा येथे एका श्री कृष्ण मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात भागवत बोलत होते. यासाठी देशभरातील ऋषी-मुनी एकत्र आले होते.
भागवत पुढे म्हणाले की, आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांपासून पळून जाऊ नका; त्यांना सामोरे जा. जिवंत असूनही पळून गेलात तर पुढचे जगणे मृत्यूसमान आहे. निसर्गासोबत चाला, हीच धर्माची गरज आहे. जगात असे लोक आहेत जे वाईट आहेत, त्यांना घाबरू नये. आमचे कोणाशीही वैर नाही. सर्वांना सोबत घेऊन जा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक पुढील महिन्यात गुजरातमधील कच्छ प्रांतातील भूज येथे होणार आहे. आरएसएसची ही बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, यंदा 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. संघाच्या रचनेनुसार एकूण 45 प्रांतातील प्रांतीय संघचालक, कार्यवाह आणि प्रांत प्रचारक आणि त्यांचे सहकारी संघचालक, सहकार्यवाह आणि सहप्रांतीय प्रचारक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.