न्यूयॉर्क : भारताच्या चांद्रयान मोहिमेचे जगभरातून कौतुक होत आहे तर दुसरीकडे ब्रिटिश माध्यमांमध्ये मात्र वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. चांद्रयान मोहिमेचे कौतुक करताना दुसरीकडे गरिबीचा सामना करणाऱ्या भारताने इतका पैसा चांद्रयान मोहिमेवर खर्च करायला हवा का? असा प्रश्न ब्रिटिशि माध्यमे विचारत आहेत. यावर उद्योगपती आनंद महिंद्रांनी सविस्तर ट्वीट करून उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्यानंतर त्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, दुसरीकडे बीबीसी वाहिनीवरील न्यूज अँकर “ज्या देशात करोडो लोकांना टॉयलेटही उपलब्ध नाही, अशा देशाने अंतराळ कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च करावेत का?” असा प्रश्न विचारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रांनी सविस्तर पोस्ट करत “अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीने भारतातील गरिबी वाढवण्यास हातभारच लावला आहे”, असे सडेतोड उत्तर दिले आहे.
दरम्यान, बीबीसीनंतर आता जीबीएन नावाच्या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित वृत्तनिवेदक भारताला ब्रिटनने हजारो कोटी दिले असून ते त्यांनी परत करावेत, असा दावा करताना दिसत आहे. “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या यान उतरवल्याबद्दल मी भारताचं अभिनंदन करतो. पण मी भारताला असंही आवाहन करतो की २०१६ ते २०२१ या काळात ब्रिटिश सरकारने भारताला आर्थिक मदत म्हणून दिलेले २४ हजार कोटी रुपये भारताने परत करावेत. पुढच्या वर्षभरात ब्रिटन भारताला ५९७ कोटी रुपये देणार आहे. पण मला वाटतं, ब्रिटिश करदात्यांनी हा पैसा थांबवावा”, असे वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने पॅट्रिक ख्रिस्टिस म्हणताना दिसत आहे.
Really?? The truth is that, in large part, our poverty was a result of decades of colonial rule which systematically plundered the wealth of an entire subcontinent. Yet the most valuable possession we were robbed of was not the Kohinoor Diamond but our pride & belief in our own… https://t.co/KQP40cklQZ
— anand mahindra (@anandmahindra) August 24, 2023
“अंतराळ संशोधन कार्यक्रम असणाऱ्या देशांना आपण पैसा द्यायचा नाही असा नियम आपण करायला हवा. जर तुम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवू शकता, तर मग तुम्ही आमच्याकडे आर्थिक मदत मागायलाच नको. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार भारतात जगभरातले सर्वाधिक गरीब राहतात. भारत ही जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचा जीडीपी ३.७५ ट्रिलियन डॉलर्स आहे. जर भारत सरकारच त्यांच्या देशातील गरीब लोकांचा विचार करत नसेल, तर आपण तरी त्यांचा विचार करून त्यांना आर्थिक मदत का द्यायची?” असा प्रश्नही पॅट्रिक विचारताना दिसत आहे.
I appear to have enraged Indian Twitter 😂 pic.twitter.com/SnhUU3zOjC
— Patrick Christys (@PatrickChristys) August 23, 2023
दरम्यान, पॅट्रिकच्या या व्हिडीओवर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. मनी कंट्रोलनं यासंदर्भात माहिती दिली आहे. “तू वर्णभेदी आहेस. तुम्ही भारताची ४५ ट्रिलियन डॉलर्सहून जास्त संपत्ती चोरून नेली. या देशाला गरीब केलं. तरीही भारतानं त्यावर मात केली आणि आता तुमच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकलं आहे”, असे एका यूजरने म्हटले आहे.