नवी दिल्ली – अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला सुरुवात करण्यावर पाकिस्तानकडून घेतला गेलेला आक्षेप भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. कोणत्याही प्रकारची जातीय तेढ भडकावू नये, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला भारताच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप न करण्यास सांगितले आहे.
“भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करणारे निवेदन पाकिस्तानातील वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालणे टाळायला हवे आणि जातीय तणाव निर्माण करू नये.’ असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
अर्थात पाकिस्तानची ही कृती आश्चर्य वाटावी, अशी अजिबातच नाही. सीमेपलिकडून दहशतवाद जोपासणे आणि आपल्याच देशातील अल्पसंख्यांकांचे धार्मिक अधिकार नाकारणाऱ्या देशाची अशाप्रकारची टिप्पणी तीव्र खेदजनक आहे, असे श्रीवास्तव म्हणाले. राम मंदिराच्या भूमिपूजनावर बुधवारी पाकिस्तानने टीका केली होती.