पुणे – टपाल विभागाने सुरू केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ग्राहकांची संख्या वेगाने वाढत जात असल्याचे सांगण्यात आले.
दूरसंचार विभागाने या संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार, इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे आतापर्यंत 2 कोटी खातेदार झाले आहेत. केवळ 2 वर्षांमध्ये मिळविलेले हे यश लक्षणीय आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 1 कोटी खातेदार झाले होते. त्यानंतर केवळ 5 महिन्यांमध्ये 1 कोटी खातेदार झाले आहेत. प्रत्येक तिमाहीला ते 30 लाख खातेदार होत असल्याचे सांगण्यात आले.
सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकारने याधी जनधन योजना लागू केली होती. या योजनेअंतर्गत आहेत त्या बॅंकांमध्ये खाते उघडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. सर्वसमावेशक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळावी, यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक तयार करण्यात आली आहे. कारण, देशातील जवळजवळ प्रत्येक गावात पोस्टाच्या सेवा उपलब्ध आहेत.
देशातील 1 लाख 36 हजार पोस्ट ऑफिसमध्ये या सेवा सुरू करण्यात आल्या असून 1 लाख 90 हजार पोस्टमनच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या घरी जाऊन सेवा देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आधार क्रमांकाच्या आधारावर बॅंकांची खाती परस्परांशी जोडली गेल्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक अशा सेवांसाठीचे सर्वांत मोठे व्यासपीठ ठरले आहे.