नवी दिल्ली – केंद्र सरकारने केलेल्या अथक प्रयत्नामुळे अन्नधान्याच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला आहे. आता फक्त डाळी आणि तेलबियाचे उत्पादन वाढविण्याची आवश्यकता आहे. पुढील काही वर्षातच या क्षेत्रातही भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
हिंदू महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलताना सितारामन यांनी सांगितले की, केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी क्षेत्रात भारत जवळजवळ आत्मनिर्भर झाला आहे. इतर क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. डाळी आणि तेलबियाचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून त्याला शेतकर्याकडून आणि कृषी तज्ञाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सितारामन एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. केंद्र सरकारने गरिबांना त्यांच्या खात्यात रोख मदत देण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात आला. यामुळे केंद्र सरकारचे 2.5 लाख कोटी रुपये वाचले. अगोदर ही सर्व रक्कम दलालांच्या हातात जात होती. त्यामुळे सरकारचे आणि गरिबांचे हे नुकसान होत होते.
मात्र आता या सर्व बाबी कमी झाल्या आहेत. गरिबांना आवश्यक ती मदत मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात बदल होत आहे. गरिबांना खर्या अर्थाने मदत व्हावी याकरिता सरकारने विविध योजना तयार करून त्याची अंमलबजावणी आग्रही पद्धतीने सुरू केली. या योजनांचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या अगोदरच्या सरकारकडेही अशा योजना होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्या 60 वर्षात गरिबांची परिस्थिती फारशी बदलली नाही. मात्र आम्ही आहे त्या रकमेचा सकारात्मक वापर केला. गरिबांना खरोखरच फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने या योजना सुरू केल्या.
शेतकर्याना मदत
शेतकर्यासाठी सुरू केलेल्या योजनेमुळे छोट्या शेतकर्यांना मशागतीसाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध झाली आहे. यामुळे या शेतकर्यांना गरिबीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे. त्यांच्या कमी क्षेत्रफळाच्या शेतीतून जास्त उत्पन्न उपलब्ध होत आहे. आगामी काळात अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि शेतीवर अधिक लक्ष देण्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी यावेळी दिले.