नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोन्याची आयात कमी व्हावी यासाठी सोन्याच्या आयातीवर अतिरिक्त शुल्क लावले आहे. तरीही मागणी वाढल्यामुळे एप्रिल ते डिसेंबर या या कालावधीत भारताची सोन्याची आयात 27 टक्क्यांनी वाढून 36 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
त्यामुळे आयात कमी करण्यासाठी सरकार आणखी काही उपाययोजना करण्याची शक्यता आहे.
गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या फाइंडिंग्जवरील आयात शुल्क दहा टक्क्यावरून पंधरा टक्के केले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 28.4 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात झाली होती. भारतातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे नागरिकाकडून दागिन्यासाठी सोन्याची मागणी वाढली असल्यामुळे सोन्याची आयात वाढली असल्याचे दिसून येते.
डिसेंबर महिन्यात तर सोन्याची आयात तब्बल 156 टक्क्यांनी वाढून 3 अब्ज डॉलर इतकी झाली असल्याचे वाणिज्य विभागाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. भारताने स्वित्झर्लंडकडून सर्वात जास्त म्हणजे 41 टक्के सोने आयात कले. त्यानंतर सौदी अरेबियाकडून 13 टक्के, दक्षिण आफ्रिका कडून दहा टक्के सोन्याची आयात केली.
भारताच्या एकूण आयात खर्चामध्ये सोन्याचा वाटा पाच टक्के आहे. तो कमी करण्याचा सरकार प्रयत्न करत असते. मात्र भारतात सोन्याचे आकर्षण जास्त असल्यामुळे सोन्याची आयात वाढत असल्याचे दिसते. सध्या सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क आहे. सोन्याची आयात जरी वाढली असली तरी पहिल्या तीन तिमाहीत भारताची चालू खात्यावरील तूट कमी होऊन 188 अब्ज डॉलर झाली आहे.
गेल्या वर्षी या कालावधीत चालू खात्यावरील तूट 212 अब्ज डॉलर होती. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची निर्यात कमी झाले असली तरी सेवाक्षेत्राची निर्यात वाढत असल्यामुळे चालू खात्यावरील तूट कमी राहण्यास मदत मिळाली आहे. या कालावधीत भारताची दागिने निर्यात 16 टक्क्यांनी कमी होऊन 24 अब्ज डॉलर झाली आहे.
—————-