सोची – भारत सरकार त्यांच्या नागरिकांच्या हितासाठी स्वतंत्रपणे वागत आहे. त्यामध्ये रशियाचा कसलाही हस्तक्षेप नाही. पश्चिम त्यांच्या मक्तेदारीशी सहमत नसलेल्या प्रत्येकातून शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरिही मॉस्को आणि नवी दिल्ली यांच्यात तेढ निर्माण करण्याचा पाश्चिमात्य देशांचा कोणताही प्रयत्न निरर्थक आहे, अशा शब्दांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पश्चिमी राष्ट्रांना इशारा दिला आहे.
रशियाच्या सोची येथे ब्लॅक सी रिझॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीच्या एका परिषदेत पुतिन बोलत होते. पाश्चात्य राष्ट्रांनी देशावर निर्बंध लादल्यानंतर सवलतीचे रशियन तेल काढून घेतल्याबद्दल भारतीय रिफायनर्सवर टीका होत असताना त्यांचे हे वक्तव्य आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना पुतिन म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक मजबूत होत आहे. भारताची आजची लोकसंख्या 1.5 अब्जाहून अधिक आहे. तरिही या देशाच्या आर्थिक वाढीचा वेग हा 7 टक्क्यांहून अधिक आहे. याचे कारण म्हणजे हा एक शक्तिशाली देश, पराक्रमी देश आहे. इतकेच नव्हे तर विद्यमान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तो अधिक मजबूत आणि मजबूत होत आहे.
रशियाच्या विकासाला जशी मर्यादा नाही, त्याचप्रमाणे भारताचा विकासही चहूबाजूंनी होत असल्याचे साऱ्या जगाने जी-20 परिषदेवेळी पाहिले असेलच, असे सांगून पुतिन म्हणाले की, आज भारत देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय क्षितिजावर जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर पूर्ण-प्रमाणावर आक्रमण सुरू केल्यापासून पुतिन हे क्वचितच रशियातून बाहेर पडले आहेत. त्यांनी अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स संमेलन आणि नवी दिल्लीतील जी-20 शिखर परिषदही टाळली. त्याची कारणे स्पष्ट करताना, पुतिन म्हणाले की, त्यांना “राजकीय शो” नको होता; म्हणून ते या परिषदांना गेले नाहीत.
मार्चमध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले केले आहे. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयावर आणि मुलांना बेकायदेशीरपणे रशियातून हद्दपार केल्याबद्दल पुतिन यांना आरोपी करण्यात आले आहे. मॉस्कोने या अटक वॉरंटला “बेकायदेशीर” म्हटले आहे.