लाहोर – बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केल्याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झालाय. बदली कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाचे कौतुक करतानाच ही मालिका जिंकण्याची भारताची निश्चितच क्षमता आहे, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
ऍडलेडमध्ये झालेल्या दारुण पराभानंतर दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केल्याबद्दल त्याने रहाणे आणि संघ व्यवस्थापनाचेही कौतुक केले. रहाणे शांत प्रवृत्तीचा कर्णधार आहे. त्याला पाहिजे त्या गोष्टी शांतपणेच करतो. त्याच्या नेतृत्वात संघाने हिंमत दाखवली आणि उत्कृष्ट कामगिरी केली, असेही अख्तर म्हणाला.
पहिल्या कसोटी सामन्यावेळी सकाळी जागा झाल्यावर भारताची धावसंख्या 9 बाद 36 अशी झाल्याचे ऐकल्यावर प्रथम विश्वासच बसला नाही. मला वाटले 9 बाद 369 धावा आहेत, पण नंतर खरा धावफलक समजला व विश्वासच बसला नाही. त्यावेळी आता पुढील सामन्यांत भारतीय संघाचे काही खरे नाही असेच वाटले होते. मात्र, ज्या पद्धतीने मेलबर्न कसोटीत भारतीय संघाची कामगिरी झाली ती पाहता ही मालिका जिंकण्याची त्यांना निश्चितच संधी आहे, असा विश्वासही अख्तरने व्यक्त केला.
संघात विराट कोहली, महंमद शमी नसतानाही विजय मिळवल्याने भारताचा हा विजय महत्त्वाचा ठरतो. तुम्ही प्रशिक्षक रवी शास्त्री, बदली कर्णधार रहाणे तसेच सांघिक यश आहे. भारताने आता ही लय सोडू नये व विजयी सातत्य कायम राखावे, असेही अख्तर म्हणाला.
10-15 वर्षांपूर्वी भारत किंवा पाकिस्तान किंवा उपखंडातील एखादा देश ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांना पराभूत करेल असा कोणी विचारही केला नव्हता, पण भारतीय संघाने ते सातत्याने करून दाखवले आहे. तसेच भारतीय संघाने अनेकदा अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धांमध्येही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले आहे, त्यामुळे यंदाही भारताला चांगली संधी आहे, असेही त्याने सांगितले आहे.