दुबई – आशिया करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघच वरचढ असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील अंतिम लढतीत भारतीय संघाने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताचे या स्पर्धेच्या इतिहासातील आठवे विक्रमी विजेतेपद ठरले.
यंदाच्या स्पर्धेत भारताला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला मात्र, त्यानंतर भारताच्या युवा संघाने स्पर्धेत थाटात पुनरागमन करताना सातत्यापूर्ण कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
खरेतर साखळीतील पराभवाचा वचपा भारताने काढावा व पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवावे अशीच अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली होती. मात्र, श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला त्यामुळे हे स्वप्न अपूरे राहिले. अंतिम लढतीत पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना प्रत्येकी 38 षटकांचाच खेळवला गेला त्यात भारताच्या अंगक्रीष रघुवंशी व शेख रशीद यांनी अफलातून फलंदाजी करत भारताचा विजय साकार केला.
श्रीलंकेचा कर्णधार दुनीथ वेलालगे याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या सहा फलंदाजांना दोनअंकी धावाही करता आल्या नाहीत. या सामन्यात संततधार पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला होता.
पाऊस थांबल्यावर खेळ सुुरू झाला मात्र, डकवर्थ-लुईस कोष्टकानुसार हा सामना 38 षटकांचाच निर्धारीत करण्यात आला. श्रीलंकेने आपल्या डावात 9 गडी गमावून 106 धावा केल्या. यासिरू रॉड्रीगोने नाबाद 19 धावा केल्या व संघाचे शतक फलकावर लावले. त्याच्या जोडीला रवीन डीसील्व्हा 15, सदीशा राजपक्षा व मथीश पथीरना यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या.
भारताकडून विकी ओस्तवालने 3 गडी बाद केले. कौशल तांबेने 2 बळी घेतले. रवी कुमार, राज बावा व राजवर्धन हंगरगेकर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. श्रीलंकेने जरी 38 षटकांत 9 बाद 106 धावा केल्या असल्या तरीही डकवर्थ-लुईस कोष्टकानुसार भारतासमोर विजयासाठी 102 धावा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.
भारताने हे आव्हान 21.3 षटकांत 1 गडी गमावून 104 धावा करत या सामन्यात विजय मिळवताना विजेतेपदालाही गवसणी घातली. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हरनूर सिंग केवळ 5 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मात्र, अंगक्रीष रघुवंशीने नाबाद अर्धशतक तर शेख रशीदने नाबाद 31 धावांची खेळी करत संघाला सहज विजय प्राप्त करून दिला.
अखंडित भागीदारी
अंगक्रीष रघुवंशी व शेख रशीद या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची अखंडित भागीदारी केली. सलामीवीर हरनूर सिंग बाद झाला तेव्हा भारताची 1 बाद 8 अशी बिकट स्थिती बनली होती. मात्र, या जोडीने एकत्र येत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना श्रीलंकेला आणखी यश मिळू दिले नाही.
रघुवंशीने नाबाद 56 धावांची खेळी करताना 67 चेंडूत 7 चौकार फटकावले. रशीदने 49 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांसह नाबाद 31 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून यासिरू रॉड्रीगोने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – श्रीलंका – 38 षटकांत 9 बाद 106 धावा. (डकवर्थ-लुईस कोष्टकाने भारतासमोर विजयासाठी 102 धावांचे लक्ष्य). भारत – 21.3 षटकांत 1 बाद 104 धावा. (अंगक्रीष रघुवंशी नाबाद 56, शेख रशीद नाबाद 31, यासिरू रॉड्रीगो 1-12).