पुणे – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याचा मुंबईच्या रणजी संघात समावेश कसा झाला. त्याने अशी कोणती कामगिरी केली की त्याला एकदम इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी मुंबई संघात स्थान दिले गेले, असा सवाल करत क्रिकेट वर्तुळातील अनेकांनी तसेच चाहत्यांनी सोशल मीडियावर केला आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) मात्र, आपल्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. संघटनेच्या निवड समितीचे अध्यक्ष व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सलिल अंकोला यांनी अर्जुनच्या निवडीला पाठींबा व्यक्त केला आहे. अर्जुन एक चांगला गोलंदाज आहे. त्याने विविध वयोगटाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मुंबई संघाच्या भविष्यातील संघाचा विचार करता त्याला संधी देणे महत्वाचे आहे, असे अंकोलाने सांगितले.
19 वर्षांखालील संघाकडून तो श्रीलंका दौऱ्यावर 2028 साली गेला होता. त्यात 33 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद केला होता. त्याला मुंबई इंडियन्सने 2021 सालच्या मोसमात त्याच्या 29 लाख या बेसप्राईजवर आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. याबाबत बोलण्याचे मात्र, संघटनेतील सदस्यांनी टाळले आहे.
चमकदार कामगिरी कोणती
अर्जुन तेंडुलकरची आतापर्यंतची कारकीर्द पाहता त्याचा वयोगट स्पर्धेत तरी समावेश होऊ शकतो का अशी शंका येते. मात्र, केवळ आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता हा एकच निकष त्याच्या निवडीमागे आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याने मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत दोन सामने खेळले असून त्याला अवघ्या 3 धावा केल्या असून 7 षटके गोलंदाजी करताना केवळ 2 गडी बाद केले आहेत.