नवी दिल्ली – टीव्ही वाहिन्यावर सतत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची तळी उचलून पक्षपातीपणा करणाऱ्या व समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकूण 14 प्रख्यात न्युज अँकर ( boycott news anchor) म्हणजेच वृत्तनिवेदकांवर विरोधकांच्या इंडिया आघाडीने (India Aghadi) बहिष्कार घालण्याचा निर्णय घोषित केला आहे.
या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली असून इंडिया आघाडीने न्युज अँकरवर बहिष्कार घालण्याऐवजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरच बहिष्कार घातला तरच या आघाडीला लाभ होऊ शकतो, अशी खिल्लीही उडवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
या संबंधात बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, भारतातील अशी कोणतीही संस्था नाही की ज्यावर या विरोधी आघाडीने हल्ला केला नसेल, मग तो निवडणूक आयोग असो किंवा न्यायालये.
या सर्व संस्था चोखपणे आपले कार्य करीत आहेत, असा दावाही संबित पात्रा यांनी केला. स्वत:च्या लाभासाठी कॉंग्रसला कोणावर बहिष्कार घालण्याची गरज असेल तर त्यांनी राहुल गांधी यांच्यावर बहिष्कार घालावा अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली.
या अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय –
विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीने 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे. यात सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी, चित्रा त्रिपाठी, अदिती त्यागी, अमन चोपडा, अमीश देवगन, आनंद नरसिंहा, अशोक श्रीवास्तव, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर आणि सुशांत सिन्हा या अँकर्सचा समावेश आहे.