हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : जिल्ह्यात वन्य प्राण्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाळीचे कुंपण करत आहेत. याच जाळीच्या कुंपनात एका काळविटाचे तोंड व शिंग अडकले. त्यानंतर प्राणी मित्राच्या सहाय्याने या काळविटाची सुटका करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सिरसम बु येथे प्राणी मित्राच्या मदतीने जाळीत अटकलेल्या काळविटाचे प्राण वाचवण्यात आले.पाण्याच्या शोधात असलेले एक काळविट सिरसम बुच्या फारशी वर्दळ नसलेल्या परीसरात एका शेतकऱ्याच्या शेतातील कंपाउंड केलेल्या जाळीमध्ये अडकले.अर्धा तासाहून अधिक काळ प्रयत्न करूनही त्याला बाहेर पडता आले नाही.
यादरम्यान संजय इंगळे या शेतकऱ्याचे लक्ष त्या अडकलेल्या काळवीटावर गेले. त्यांनी तात्काळ प्राणी मित्र असलेल्या सोनु भिसडे व बालाजी सरकटेला यांना फोन करून बोलावून घेतले. प्राणी मित्रांनी घटनास्थळी दाखल होत अवघ्या 5 मिनीटात काळवीटांची सुटका केली.
शेतकरी आणि प्राणी मित्रांच्या समय सूचकतेमुळे एका मुख्य जीवाचे प्राण वाचले. जाळीमध्ये अडकलेले शिंग आणि तोंड निघताच काळविट मुक्तपणे उड्या मारत जंगलात निघून गेले.