IND vs ENG 5th Test, Dharamshala :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी हरल्यानंतर मालिकेतील उर्वरीत सर्व सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी भारताला धरमशाला कसोटीत मिळते आहे. असे झाले तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल.
तसेच मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने सातव्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे. र्मशाला येथील पाचवी कसोटी जिंकताच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांशी बरोबरी करण्याची संधी आहे. खरे तर, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर आतापर्यंत केवळ दोनच संघांनी दमदार पुनरागमन करून उर्वरित चार सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने दोनदा आणि इंग्लंडने एकदा असे केले आहे. इंग्लंडने शेवटच्या वेळी ११२ वर्षांपूर्वी असे केले होते. 1912 मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर इंग्लिश संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि उर्वरित चार सामने जिंकले. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने १८९७-९८ आणि १९०१-०२ मध्ये हा विक्रम नोंदवला होता.
विद्यमान मालिकेमधील हैदराबादची पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली. यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी १०६ धावांनी जिंकली. राजकोटची तिसरी कसोटी ४३४ धावांनी जिंकली आणि त्यानंतर रांचीमधील चौथी कसोटी पाच विकेटने जिंकली.
भारताने घरच्या भूमीवर सलग १७ वी कसोटी मालिका जिंकली आहे. हाही एक विक्रमच आहे. हा विजयी सिलसिला २२ फेब्रुवारी२०१३ पासून आत्तापर्यंत सुरू आहे. या बाबतीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी १९९४ ते २००१ पर्यंत मायदेशात सलग दहा कसोटी मालिका जिंकल्या होत्या.