– हिमांशू
आयुष्यात कधीच खोटं न बोललेला माणूस शोधून सापडणार नाही. कधी अडचणीत सापडू नये म्हणून, तर कधी अडचणीत सापडलो म्हणून प्रत्येकजण कधी ना कधी खोटं बोलतोच. खोटं बोलायचं नाही, असा निर्धार करणारासुद्धा कधीतरी अनवधानानं त्याच्याही नकळत खोटं बोलून जातो. अजाणतेपणी म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा, खोटं बोलण्याची प्रत्येकाची स्वतंत्र कारणं असतात तशी स्वतंत्र स्टाइलसुद्धा असते. काहीजणांना खोटं अजिबात लपवता येत नाही, म्हणून ते खरं बोलतात. परंतु काहीजणांचं खोटं बोलणं इतकं खरं वाटतं, की हळूहळू त्यांना खोटं बोलायचीच सवय लागते आणि मग अशी माणसं क्वचितच खरं बोलतात.
लखोबा लोखंडे नावाचं असंच एक पात्र आपण ‘तो मी नव्हेच’ नाटकात बघितलं. दैनंदिन जीवनातही अनेक लखोबा आपल्याला पावलोपावली भेटत असतात, याची दोन कारणं म्हणजे, थापा मारून त्यांचा ङ्गायदा होतो आणि त्यांच्या थापा पचतातही! खोटं बोलून आपल्याला बरंच काही मिळतंय, हे एकदा लक्षात आलं की माणूस खरं कशाला बोलेल?
पण खोट्याच्या प्रत्येक प्रवासाला कधीतरी शेवट असतोच. अशाच एका लखोबाची कहाणी खोट्या मेलमुळे चव्हाट्यावर आली. झालं असं, की दिल्लीहून कोलकात्याला निघालेल्या विमानात बाँब असल्याचा मेल विमानतळाच्या ड्यूटी मॅनेजरला आला आणि जोरदार चक्रं ङ्गिरली. अशा खोट्या धमक्या वारंवार येतच असतात; पण यावेळी त्यामागचं कारण भन्नाट होतं.
संबंधिताला या विमानाचं उड्डाण रोखायचं होतं, कारण त्याचा मेव्हणा, बायकोचा भाऊ कोलकत्याला यायला निघाला होता आणि तो कोलकत्याला पोहोचला असता, तर या महाशयांचं पितळ उघडं पडणार होतं. थापा आणि ङ्गसवणुकीची मोठी मालिका उघड होणार होती. अर्थात, विमानाची तपासणी करून बाँब नसल्याचं निष्पन्न झाल्यावर जो तपास झाला, त्यातून उलगडलेली स्टोरी लखोबापेक्षा भारी..! पठ्ठ्या बांगलादेशचा नागरिक. तिकडे असंख्य थापा मारून त्याने 50 लाखांचं कर्ज करून ठेवलेलं.
कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो भारतात आलेला. पंजाबातल्या एका विद्यापीठात शिकताना त्याची एका मुलीशी मैत्री झाली. शिक्षण संपल्यावर दोघे आपापल्या घरी गेले. चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं. आपण अमेरिकेत पीएच.डी. करतो आहोत आणि आपण दोघांसाठीही व्हिसा मिळवलाय, ही थाप मुलीला पटली; पण बरेच दिवस लोटले तरी पठ्ठ्या तिला घेऊन अमेरिकेला जाण्याचं नाव काढेना. एक थाप पचवण्यासाठी त्याला अनेक थापा माराव्या लागल्या. पण शेतकर्यांचं आंदोलन सुरू असल्यामुळे आपण कोलकत्यात अडकून पडलोय, ही थाप काही पचली नाही.
त्याची टाळाटाळ पाहून मुलीनं तिच्या भावाला कोलकात्याला पाठवायचं ठरवलं. तो तुला भेटायला येतोय, असं नवर्याला कळवलं आणि मेव्हण्याला दिल्लीतच रोखण्यासाठी पठ्ठ्याने चक्क विमानात बाँब असल्याचा मेल केला. त्यासाठी तात्पुरता ईमेल आयडी बनवला. पण ज्या हॉटेलमध्ये त्याचा मेव्हणा त्याला भेटायला येणार होता, तिथलाच वाय-ङ्गाय वापरला आणि घोळ झाला. ज्या विमानात बाँबची अङ्गवा होती, त्यातून एक व्यक्ती त्यालाच भेटायला आल्याचं पोलिसांना समजलं आणि पठ्ठ्या पकडला गेला.